शिवसेना 16, राष्ट्रवादी 15 आणि कॉंग्रेस 12 खाते
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा हा बऱ्याच खलबतानंतर सुटला आहे. त्यासाठी कॉंग्रेस आणि राष्अ्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. त्यातच आता शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्तास्थापन करण्यासाठीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे.या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनला 11 कॅबिननेट आणि 5 राज्यमंत्रीपदे तर राष्ट्रवादीला 12 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदे आणि कॉंग्रेसला 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपदे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीवरून मुंबईत दाखल झाल्यानंतर रात्री त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील सिल्व्हर ओकमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी आघाडीच्या नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टचा कारभार शिवसेना पाहणार आहे तर शिर्डीच्या संस्थानाचा कारभार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे राहणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शिवसेनेला 27 महामंडळे तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना 25 महामंडळे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, रात्री झालेल्या या बैठकीत आगामी सरकारच्या मुख्यमंत्रीपद, विधानसभाध्यक्ष, खातेवाटत आणि महत्वपूर्ण अशा पदांवर चर्चा झाली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या बैठकीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.