प्रशांत जाधव
डांबेवाडीतील “खैर’तोड प्रकरण; व्यापारी सोडून शेतकऱ्यांना धाडल्या नोटिसा
सातारा – खटाव तालुक्यातील डांबेवाडी येथे खैर या वनस्पतीची बेसुमार अवैध तोड करण्यात आली होती. याबाबत वन विभागाला साधा मागमूसही नसताना काहीजणांनी मात्र, आपली “डाळ’ कुठे शिजतेय का याची चाचपणी केली होती. दै. “प्रभात’ने व्यापाऱ्याकडून 15 लाखांच्या “खैरा’ची कत्तल’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केल्यानंतर वन विभागाला जाग आली.
त्यानंतर पाहणीचा सोपस्कार पार पाडूनही आठवडा उलटला तरी कोणतीही ठोस कारवाई न करता अधिकाऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना नोटीसा धाडून कर्तव्यदक्ष असल्याचा आव आणला आहे. या प्रकारामुळे वन विभाग “चोर सोडून संन्याशाला देतंय फाशी’ अशी कृती करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
दुर्मिळ वनसंपदा असल्याने त्याची तोड करण्यास अथवा विक्री करण्यास बंदी असलेल्या खैराची बेकायदेशीर तोड करून सुमारे 15 लाखांच्या सरकारी महसुलाला चुना लावल्याची घटना डांबेवाडी (ता. खटाव) येथे स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आली. वन विभागाशी संपर्क साधला असता त्यांना काहीच माहिती नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.
मात्र, याचवेळी वन अधिकारी याच विषयावर काही लोकांशी कमराबंद चर्चा करत बसले होते. कधी काळी विपुल वनसंपत्ती असलेल्या झाडांना नष्ट करण्याचा विडा जंगल माफियांनी वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उचलला आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे.
सध्या सुरू असलेल्या अवैध खैर लाकूड तोडीकडे वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यानेच तिथे बेसुमार तोड सुरू असल्याची चर्चा असतानाच वन अधिकाऱ्यांनी आता शेतकऱ्यांनाच नोटिसा धाडल्याने त्यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ते म्हणतात, “आमचं हप्ते आहेत’
वन अधिकाऱ्यांच्या नोटिसा मिळाल्यानंतर भयभीत शेतकऱ्यांनी प्रभात’शी संपर्क साधून त्यांची व्यथा मांडली. खैर कोणी तोडले, कधी तोडले याबाबत आम्हाला काहीच माहित नव्हते. शनिवारी गावात वन विभागाचे अधिकारी व इतर लोक आल्यानंतर हा प्रकार आम्हाला कळाला. त्यानंतर आम्ही काही दिवसांआधी खैराची मागणी केलेल्या लोकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी तुम्ही घाबरू नका, आमचे हप्ते आहेत, असे सांगितल्याचे एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
स्थानिक शेतकरी.
शनिवारी पाहणी, सोमवारी पत्र, अन् बुधवारी नोटीस
डांबेवाडी येथे खैराची तोड असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेत घटनास्थळाची पाहणी शनिवारी दि. 22 रोजी केली होती. त्यानंतर त्यांनी बुधवार दि. 26 रोजी शेतकऱ्यांना धाडलेल्या नोटीसमध्ये एका संघटनेच्या सोमवार दि. 24 रोजीच्या पत्राचा उल्लेख केला आहे. वनअधिकाऱ्यांनी स्वत: शनिवारी पाहणी केली असताना सोमवारपर्यंत कुणीतरी तक्रार करण्याची वाट का पहावी लागली, असा सवाल उपस्थित करून शनिवार, रविवार या दोन दिवसांत कारवाईऐवजी काही खलबते तर झाली नाहीत ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
रेड हॅंड पकडणार होता त्याचे काय झाले?
डांबेवाडी येथे “खैर’ या वनस्पतीची तोड सुरू असल्याचे ग्रामस्थांनी “प्रभात’कडे कथन केल्यानंतर खटावच्या विभागीय वन अधिकारी शीतल फुंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी डांबेवाडीत खैराची तोड सुरू असल्याचे मान्य करून आम्ही लवकरच संबंधितांना “रेड हॅंड पकडू’, असा दावा केला होता. या घटनेला जवळपास आठवडा उलटला तरी त्यांना कोणालाच पकडता न आल्याने अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. रेड हॅंड पकडणार होता तर मग शेतकऱ्यांना नोटीसा का धाडल्या, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.