विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आदेश
पुणे- पायी पालखी सोहळ्यावर करोनाचे सावट असल्याने आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. तरीदेखील जिल्ह्यातील ठिकठिकाणावरून वेगवेगळ्या दिंड्या निघाल्या असल्याचा प्रकार पंढरपूरजवळील काही गावात घडला आहे. परंतु, अशी दिंडी काढण्याबाबत शासनाकडून निर्बंध घालण्यात आल्याने या वारकऱ्यांना जागेवर थांबविण्यात आले आहे. पायी दिंडी काढण्यावर निर्बंध असल्याने कोणीही वेगवेगळ्या दिंड्या काढू नयेत, तसेच विभागातील जिल्ह्यधिकाऱ्यांनी देखील परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा रद्द करण्यात आला असून राज्य शासनाच्या सूचनेनुसार एक दिवस अगोदर पालख्या आळंदी ते पंढरपूर येथे पोहोचविण्यात येणार आहे. तत्पूर्वी परंपरेनुसार श्री संत तुकाराम महाराज यांची 12 जून रोजी तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची 13 जून रोजी 50 व्यक्तींच्या उपस्थितीत अनुक्रमे देहू आणि आळंदी येथील मंदिर परिसरात पालखी फिरवून पालख्यांनी प्रस्थान ठेवले आहे; परंतु सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरजवळील अनेक छोट्या मोठ्या गावातील वारकऱ्यांनी पंढरपूर येथे पायी दिंडी काढली आहे; परंतु अशी दिंडी काढण्याबाबत शासनाकडून निर्बंध घालण्यात आल्याने या वारकऱ्यांना जागेवर थांबविण्यात आले आहे.
विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याधिकाऱ्यांना अशा दिंड्यांना परवनागी देण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांतून देखील कुठलीच पायी दिंडी घेऊन वारकरी पंढरपुरात जाणार नाही असे आदेश शासनाने दिले आहेत, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगत पायी वारकऱ्यांची दिंडी निघाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
पंढरपूर येथे दर्शनासाठी पास देऊ नये…
श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आषाढी एकादशीपर्यंत कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांनी या कालावधीपर्यंत पंढरपूर येथे दर्शनासाठी प्रवास करू नये. श्री क्षेत्र पंढरपूर येथे दर्शन करण्यास जाण्याकरीता प्रवास पास वितरित न करण्याबाबत देखील राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात यावी, असे पत्र पुणे विभागीय आयुक्त यांनी पाठविले आहे.