पर्यटनाला करोनाचा ब्रेक; प्रवेशाचा निर्णय लांबल्यास उत्पन्नाला फटका
सातारा (प्रतिनिधी) – जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेल्या कास पठाराचा यंदाचा फुलोत्सव अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत. पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला तरी पर्यटकांना प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर अडकणार आहे.
कास पठारावर दरवर्षी सप्टेंबर महिन्यात फुलणारा फुलांचा हंगाम राज्यातच नव्हे तर देशपातळीवर प्रसिद्ध आहे. ऑगस्टअखेर ते ऑक्टोबर या काळात नानाविध फुलांचे ताटवे येथे बहरतात. संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञ समितीने निसर्गाचा हा दुर्मिळ वारसा जपण्यासाठी कास पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. मात्र, यंदा करोना संक्रमणामुळे कासचा फुलोत्सव अडचणीत आला आहे. त्यामुळे पर्यटन हंगामाचे वेळापत्रक बिघडणार आहे. कासच्या पठाराला दरवर्षी दोन लाख पर्यटक भेट देतात. त्या माध्यमातून स्थानिक रोजगाराला चालना मिळते.
करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यंदा पर्यटनापासून स्थानिकांना मिळणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला आहे. राज्य शासनाने काही अंशी हॉटेल व कृषी पर्यटन केंद्रांना 33 टक्के पर्यटकांना प्रवेश देण्याची परवानगी दिली असली तरी सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझेशन याचीही अट घातली आहे. मात्र, कास पठारावर पर्यटकांना प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह घेणार आहेत. पर्यटकांना परवानगी दिल्यास डिस्टन्सिंग आणि स्वच्छता त्याचबरोबर सुरक्षितता याचे कोणतेही नियोजन वन विभागाकडे नसल्याने पर्यटन हंगामाचे तूर्त नियोजन करू नका अशा सूचना वन विभागाने संयुक्त व्यवस्थापन समितीला दिल्या आहेत.
दीड महिन्यांचा कास पठाराचा फुलोत्सव येथील स्थानिकांच्या रोजगाराचा प्रमुख स्त्रोत आहे. बामणोली, तापोळा येथे नौकानयनामुळही लाखो रुपयांची उलाढाल होते. करोनामुळे बोटचालकांचा उन्हाळ्याचा हंगाम वाया गेला. आता कास फुलोत्सवाच्या निमित्ताने पर्यटकांना माफक संख्येने परवानगी दिली जावी, अशी कास ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
सातारा जिल्ह्यात सध्या करोना संक्रमणाचे चित्र भयावह आहे. पर्जन्य हंगाम जर लांबला तर आर्द्र वातावरणामुळे करोना संक्रमण अधिक वाढू शकते. जिल्हाधिकाऱ्यांनी कास पठारासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. वन विभागाचेही अद्याप कोणते स्वतंत्र नियोजन नाही.
एस. एस. परदेशी , वनपरिक्षेत्र अधिकारी, कास पठार.