सुनिल पोरे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस
म्हसवड – सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक गावे विस्थापित झाली असताना केवळ माण तालुका वरूणराजाने वंचित ठेवला आहे. पावसाअभावी माण तालुक्यातील जनतेवर स्थलांतर करण्याची वेळ आली असल्याने शासनाने माणदेशी माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून उरमोडीचे पाणी माणगंगा नदीत सोडून कायम दुष्काळी माणला दिलासा द्यावा, या मागणीसाठी 15 ऑगस्टपासून निवृत्त अभियंता सुनिल पोरे यांनी महात्मा फुले चौकात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास नागरिकांतून पाठिंबा मिळत आहे.
उरमोडीचे वाहुन जाणारे पाणी माणगंगा नदीला सोडावे या मागणीसाठी सुनिल पोरे हे 15 ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून या उपोषणाला नागरिक व शेतकऱ्यांमधून पाठिंबा मिळत आहे. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देत नागरिकांनी उद्या म्हसवड बंदचे आवाहन करून रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन म्हसवड पोलिसांत देण्यात आले आहे.
माण तालुक्यात सितामाईच्या डोंगरावर उगम पावलेली माणगंगा नदी राज्यात गत दहा वर्षात एकदाही पूर न आलेली एकमेव नदी आहे. तर तालुक्यातील राजवडी, आंधळी, पिंगळी, राणंद, जाशी, ढाकणी, मासाळवाडी, तुटकाकडा हे तलाव कोरडे पडले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र पाण्याखाली वाहत असताना माण मात्र कोरडा ठणठणीत आहे. हे माण तालुक्यातील जनतेचे मोठे दुर्दैव आहे. शेतकरीवर्ग खूप मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अनेक गावामध्ये दोन तीन वर्षे पावसाने साधी हजेरीही लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर माण तालुक्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे.
केवळ दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करण्याऐवजी दुष्काळ हटवण्यासाठी गंभीरपणे विचार करावा व सध्या सातारा जिल्ह्यातून वाहून जात असलेले उरमोडीसह इतर योजनांचे पाणी कोरड्या माणगंगा नदीत सोडून राजेवाडी तलावासह तालुक्यातील आंधळी, ढाकणी, पिंगळी, राणंद, जाशी, मासाळवाडी, तुटकाकडा आदी तलाव भरून घेतले तर माण तालुक्यातील बहुतांश दुष्काळ हटणार आहे.
माण तालुक्यातील जनतेला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने वीज वितरणचे बिल भरून उरमोडीचे पाणी माणगंगा नदीत सोडावे या मागणीसाठी सुनिल पोरे यांनी 15 ऑगस्ट पासून उपोषणास बसले आहेत. या उपोषणास नागरिकांतून पाठिंबा मिळत आहे.