तब्बल 14 लाख नागरिकांना पूराचा फटका
गोवाहटी – गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती गंभीर बनली आहे. पूर आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पूराचा फटका 25 जिल्ह्यांना बसला असून पुरामुळे तब्बल 14 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे. बारपेटा या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून या एकट्या जिल्ह्यातील 5 लाख 22 हजार नागरिक पूरामुळे प्रभावित झाले आहेत.
आसाममधील एकूण 2, 168 गावे पाण्याखाली गेली आहेत. तर 51,752 हेक्टर जमिनीवरील शेतीचे नुकसान झाले आहे. विस्थापितांना राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ताडपत्री, पिण्याचे पाणी, तेल आदी अत्यावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटप करण्यात येत आहे. राज्य प्रशासनाच्यावतीने 21 जिल्ह्यांमध्ये 234 ठिकाणी आश्रय छावण्या उघडण्यात आल्या आहेत.
आसामसह मेघालयामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेशमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशामध्ये मेघगर्जनेसह आणि वीजांच्या कडकडासह पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणीही पावसाचा जोर कायम आहे.