29 जुलैला महामोर्चा : ओबीसी नेते एकवटणार
बारामती (प्रतिनिधी) – ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणासाठी बारामतीत आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी ओबीसी नेत्यांनी वज्रमूठ बांधली. दि.29 जुलैला हा मोर्चा निघणार असून त्यात राज्यातील ओबीसी नेते येणार असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली आहे.
लोणी भापकर येथे ओबीसी नेत्यांच्या राज्यव्यापी बैठकीतील निर्णयांची माहिती येथे पत्रकारांना देण्यात आली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले. या आरक्षणाच्या धर्तीवर 1995 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. परंतु, येत्या निवडणुकामध्ये ओबीसी प्रवर्ग रद्द होणार असल्याने राजकीय हक्कावर गदा येणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार ओबीसीच्या आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही.
म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी एल्गार महामोर्चाचे काढणार आहे. त्याची सुरुवात बारामतीतून केली जाणार आहे. एल्गार महामोर्चामध्ये ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींचा समावेश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महामोर्चासाठी राज्याभर गावोगावी घोंगडी बैठक, सभा, फेसबुक, व्हॉट्सऍपच्या माध्यमातून जनजागृती करणार आहेत. हा मोर्चा राजकीय पक्षविरहित असेल. सर्व ओबीसी नेत्यांना आमंत्रित करणार आहे. छगन भुजबळ, नाना पटोले, एकनाथ खडसे, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, पंकजा मुंडे, महादेव जानकर आदी प्रमुख नेत्यांना आमंत्रित करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, ऍड. गुलाबराव गावडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ, डॉ. अर्चना पाटील, समता परिषदेचे अनिल लडकत, संपतराव टकले, गणपत देवकाते, बापूराव सोलनकर, मच्छिंद्र टिंगरे, रवींद्र थोरात, वसंत घुले, चंद्रकांत वाघमोडे, दत्तात्रेय पुणेकर, विष्णुपंत चौधर उपस्थित होते.