मुंबई – राज्यातील करोना रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ही थेरपी मुंबईतील लिलावती रुग्णालयात करण्यात आली आहे. तसेच दुसरा प्रयोग नायर रुग्णालयातील रुग्णावर करण्यात येणार असून तोही यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, कृषिमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले, लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळाले आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यांचं पालन केले तरच थेरपी यशस्वी होत असल्याचे मला सांगण्यात आले आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
मालेगावमधील परिस्थितीवर राजेश टोपे म्हणाले, दाटीवाटीची जागा असल्याने अनेक ठिकाणी लोकाना घरात क्वारंटाइन होणे शक्य नाही. पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाइन केले जाव अशी सूचना जिल्हाधिऱ्यांना दिली आहे. बैठकीत मालेगावमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यात आली.