-संजय दुधाणे
देशाची राजधानी दिल्ली येथील न्यू रेल्वे स्टेडियम… दिनांक 3 मे 1959… वेळ सकाळी दहाची. लाल मातीच्या आखाड्यात हजारो कुस्तीशौकिनांच्या गराड्यात एक विलक्षण लढत… देशाचा पहिला हिंदकेसरी कोण? हे ठरविणारी लढत झाली. नवी दिल्लीतील भव्य स्टेडियम गर्दीने फुलून गेले होते. मल्लविद्येत सारख्याच तोलाचे असलेले पंजाब व महाराष्ट्र हे दोन प्रांत आपली परंपरा व वारसा घेऊन या अजिंक्यपदाच्या मुकुटासाठी पुढे सरसावले होते. रूस्तुम-ए-पंजाब बंत्तासिंग व श्रीपती खंचनाळे हे दोघे आपापल्या प्रांताची प्रतिष्ठा पणाला लावून मैदानात उतरणार होते.
प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरांत कुस्तीचा पुकार होताच दोघे मल्ल मैदानात आले आणि एकमेकांना आव्हान देण्याच्या पवित्र्यात उभे राहिले. प्रारंभी खडाखडी कुस्ती सुरू झाली आणि दोन्ही मल्ल एकमेकांचे बल अजमाविण्याचा प्रयत्न करू लागले. दोन्ही मल्ल आपली ताकद व कौशल्य पणाला लावू लागले आणि सहाव्या मिनिटाला श्रीपती खंचनाळेने बंत्तासिंगला खाली घेतले.
मैदानावरच्या हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. श्रीपती आता बंत्तासिंगला भारी पडणार, हे उघड होते. श्रीपतीच्या पोलादी मिठीत अडकून बसलेला बंत्तासिंग मातीत रुतून बसला होता. निसटून वर येण्यासाठी त्याची धडपड चालली होती.
…आणि कुस्तीचा रंग क्षणात अचानक पालटला. श्रीपतीच्या मगरमिठीतून बंत्तासिंग वाऱ्याच्या वेगाने खालून निसटला व उभा राहिला. मैदानात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. वर आल्यानंतर बंत्तासिंग नव्या तडफेने लढू लागला. श्रीपतीनं पुन्हा त्याला खाली घेतलं आणि हा-हा म्हणता घुटना ठेवून बंत्ताला चारी मुंड्या चीत केले. महाराष्ट्राच्या सिंहापुढे पंजाबचा वाघ शरण आला होता. मैदानात एकच जल्लोष झाला.
पुण्यात झाली होती भविष्यवाणी
श्रीपती खंचनाळे हे वर्षभरात देशात नाव गाजविणार, ते हिंदकेसरी होणार ही भविष्यवाणी पुणे शहरात झाली होती. दिल्लीला हिंदकेसरी स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी 2-3 महिने खंचनाळे यांचा मुक्काम पुण्यात होता. मंडईत रहाणारे तात्या थोरात यांच्या वाड्यात ते राहात असत. थोरांताकडे प्राध्यापक असणारे एक ज्योतिष मित्र होते. त्यांची पुण्यात आल्यावर खंचनाळे यांच्याशी थोरात यांनी भेट घडवून आणली. तेजःपुंज चेहरा पाहून ज्योतिषशास्त्र जाणणारे प्राध्यापक महोदय खंचनाळे यांना म्हणाले की, वर्षभरात तुमचे नाव देशात गाजणार आहे, अनमोल कीर्ती तुम्ही संपादन करणार आहात. हिंदकेसरी स्पर्धाही जिंकाल. अवघ्या सहा महिन्यांतच मे 1959 मध्ये श्रीपती खंचनाळे यांनी हिंदकेसरी किताब जिंकला आणि पुण्यात झालेली भविष्यवाणी खरी ठरली.
राजर्षी शाहूंच्या राजाश्रयाने कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर बनले आणि पुढे लोकाश्रयामुळे बहरत गेले. यातून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल इथे निर्माण झाले. श्रीपती खंचनाळे यांनी पहिल्या हिंदकेसरीपदाची गदा आपल्या खांद्यावर घेत या मल्लपरंपरेत मानाचा शिरपेच रोवला. जन्मभूमी कर्नाटक, तर कर्मभूमी मात्र महाराष्ट्र असे आगळे वैशिष्ट्य श्रीपती यांचे होते.
भारताच्या पहिल्या हिंदकेसरीचा मान मिळविणारे श्रीपती खंचनाळे यांचा सत्कार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्ली येथे आपल्या निवासस्थानी केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही मंत्रालयात त्यांना गौरविले. कोल्हापूरचे छत्रपती शहाजीमहाराजांनीही शाहू खासबाग मैदानात राजर्षी शाहूंच्या स्वप्नपूर्तीचा सत्कार केला.
तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र सबनीस यांनीही कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने त्यांना सन्मानित केले. सर्वश्रेष्ठ हिंदकेसरी किताब मिळाल्यावर अहंकारांच्या आहारी न जाता श्रीपती यांनी आपल्या कलेची आराधना मनोभावे चालू ठेवली.