दिल्ली : नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील विविध भागात निदर्शने होत आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निदर्शने हिंसक झाली आहेत. आसाममध्ये निषेधादरम्यान झालेल्या मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. त्याचबरोबर आसाम आणि पश्चिम बंगालच्या बर्याच भागात अजूनही इंटरनेट निर्बंध कायम आहेत.
जामिया विद्यापीठात निषेध करणार्या विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या मथुरा रोडवर परिवहन विभागाच्या गाडयांना आग लावली. तसेच 6 बसची तोडफोड करण्यात आली आहे. याशिवाय जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातही बसला आग लावण्यात आली आहे.
गुवाहाटी येथे रविवारी दोन निदर्शकांचा मृत्यू झाला आहे. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात गुरुवारी पोलिसांच्या गोळीबारात हे दोघेही जखमी झाले होते . ईश्वर नायक आणि अब्दुल अलीम अशी मृतांची नावे आहेत.
आसाममधील निषेधादरम्यान मृतांची संख्या पाचवर गेली आहे. गुरुवारी झालेल्या निदर्शनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोन जण ठार झाले होते . शनिवारी ऑईल टँकरला लागलेल्या आगीत आगीत अडकून एकाचा मृत्यू झाला.