विराज शिंदे यांचे उपजिल्हाधिकारी थोरवे यांच्याकडे निवेदन
वाई (प्रतिनिधी) – संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने शेतीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. पावसाने खरीप हंगामातील संपूर्ण पिके वाया गेली आहेत तर रब्बी हंगाम पेरणी करण्यास मिळणार की नाही याची शाश्वती देता येत नाही. शेतातील भात, सोयाबीन, टोमॅटो, ऊस, हळद, फुलशेती, पूर्णपणे वाया गेली असून शंभर टक्के नुकसान झाले आहे. तरी शासनाने त्वरित हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावेत तसे पंचनामे तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे यांनी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदनाव्दारे केली आहे.
दरम्यान, पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाचे हेलपाटे मारण्यास भाग पाडून ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिखावा करून वाई तालुक्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात येवू नये. तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करून त्यांच्या दुःखवर फुंकर मारण्याचा प्रयत्न करावा, असेही विराज शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात निवडणुका होवून दहा दिवसांचा कालावधी उलटला तरीही स्थिर सरकार स्थापन करण्यात यश आलेले नाही, त्यामुळे पक्षांच्या घोडेबाजारात शेतकऱ्यांची ससेहोलपट होताना दिसत आहे, कुणाचेही सरकार येवो परंतु वाई तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा युवक कॉंग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल तसेच वेळप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास शासन सर्वस्वी जबाबदार असेल असाही इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे.
निवेदनावर विराज शिंदे, जिल्हा अध्यक्ष युवक कॉंग्रेस, कोरेगाव विधानसभा अध्यक्ष अजित भोसले, वाई विधानसभा अध्यक्ष विशाल डेरे, सातारा जिल्हा महासचिव शाहीद इनामदार, सातारा विधानसभा अध्यक्ष विक्रांत चव्हाण, सोशल मीडिया समन्वयक सातारा जिल्हा अमित जाधव, नरेंद्र पाटणकर सचिव सातारा जिल्हा, सागर गायकवाड, विशाल पवार, गणेश शिंदे, अजित घोरपडे, सूरज कीर्तिकर यांच्या सह्या आहेत.