नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सोमवारी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच या राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. आर्थिक सुधारणा आणि गुंतवणूक पुरक वातावरण निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर त्या यावेळी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय अर्थसचिव टीव्ही सोमनाथन यांनी अलिकडेच या बैठकीच्या संबंधात माहिती देताना सांगितले आहे की, ही बैठक प्रामुख्याने राज्य पातळीवरील विषयाशी संबंधीत असेल. त्यात राज्य सरकारांच्या संधी आणि आव्हानांवर चर्चा होईल.
केंद्र सरकारने भांडवली खर्च वाढवण्याची तयारी सुरू केली असून खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही सध्या वाढताना दिसत आहे. परंतु ही गुंतवणूक अजून अपेक्षित प्रमाणात वाढत नाही त्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यास केंद्र सरकारकडून चालना दिली जाणार आहे.
कोविडच्या दोन लाटेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी उणे 7.3 इतका झाला होता. तथापि चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या अवधीतील विकास दर 20.1 टक्क्यावर गेला असल्याचे सांगण्यात येते.
तसेच चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यात देशातील विदेशी गुंतवणूक 64 अब्ज डॉलर्सपर्यंत गेली आहे. या सगळ्या वातावरणात राज्य सरकारांना नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच संधीचा लाभ घेण्यासाठी उद्युक्त करणे हा या बैठकीचा महत्वाचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते.