नवी दिल्ली: अयोध्या येथील राजकीयदृष्ट्या संवेदनशील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादावरील प्रदीर्घकाळ रेंगाळलेल्या सुनावणीचा महत्त्वपूर्ण अंतिम टप्पा उद्या (सोमवारी) सुरू होत आहे. आठवड्याभराच्या दसऱ्याच्या सुटीनंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीचे कामकाज पुन्हा सुरू केले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 6 ऑगस्टपासून दैनंदिन कामकाजाला सुरूवात केली होती. मध्यस्थीने तोडगा काढण्यात अपयश आल्याने कार्यवाहीला गुंडाळण्याच्या अंतिम मुदतीत बदल करण्यात आला असून ही मुदत आता 17 ऑक्टोबर रोजी निश्चित केली आहे.
सुरुवातीला खालच्या कोर्टात तब्बल पाच खटले दाखल झाले होते. 2010 च्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 14 आव्हान याचिका दाखल केल्या गेल्या होत्या. या निकालानुसार अयोध्यामधील 2.77 एकर जागेचे विभाजन सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही अखाडा आणि राम लला या तीन पक्षांमध्ये समान प्रमाणात करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, आधीच्या वेळापत्रकापेक्षा एक दिवस आधी 17 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होईल, असे 5 सदस्यांच्या खंडपीठाने सांगितले होते. दीर्घ युक्तिवादाच्या अंतिम टप्प्याचे वेळापत्रक ठरवताना मुस्लिम पक्ष 14 ऑक्टोबरला युक्तिवाद पूर्ण करेल आणि त्यानंतर हिंदु पक्षांना 16 ऑक्टोबरपर्यंत पुन्हा सारांश सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली जाईल, असे न्यायालयाने सांगितले गेले होते. 17 नोव्हेंबररोजी या प्रकरणी निकाल सुनावण्यात येणार आहे, याच दिवशी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होणार आहेत.