अवकाळी पावसामुळे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी : उरले-सुरले पदरात घेण्यासाठी धडपड
तळेघर – आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भात काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून भात काढणी जलद गतीने सुरू आहे. आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भाग हा पावसाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, परंतु यावर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातच आपला मुक्काम वाढवल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घासावर पावसाने पाणी फेरले आहे.
आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात चालू वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे भात पिकासह खरीप हंगामातील पिके जोमात होती. मात्र अंतिम टप्प्यात पिके परिपक्व झाली असताना परतीच्या व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या घासावर पानी फिरले. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पानी साचल्याने पिके भुईसपाट झाली होती. पिकांची मुळे सडून गेली. भेटेल त्या अवस्थेत शेतकरी आपली उरलेली सुरलेली पिके काढून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. परतीच्या पावसाने भात उत्पन्नात सरासरी चाळीस टक्के घट होणार असल्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
भात शेतीची नुकसान झाल्याची खंत शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिसत आहे. तळेघर येथील शेतकरी अशोक रोंगटे, भरत मेचकर, पंडू मोरमारे म्हणाले की, यावर्षी भाताचे पीक जोरदार होते. चांगले पीक येण्याची शक्यता होती; पण परतीच्या पावसाने सगळे नुकसान केले. आमची दिवाळी पण यंदा सुकीच गेली. दिवाळीपर्यंत तर आम्ही मोकळे होत होतो; पण अजूनही आमची शेतीचीच कामे चालू आहे.