लाहोर : इंग्लंडमध्ये 1999 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि बांगलादेश विरुद्धचा साखळीतील सामना तसेच अंतिम फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना तत्कालीन कर्णधार वसिम अक्रम यानेच फिक्स केल्याचा धक्कादायक आरोप तत्कालीन पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक व माजी कसोटीपटू सर्फराज नवाज यांनी केला आहे. त्यांनी हेच आरोप ही स्पर्धा संपल्यावर देखील केले होते. त्यात अक्रमला चौकशीनंतर क्लिनचीटही देण्यात आली होती. आता पाकिस्तानमधील एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सर्फराज यांनी पुन्हा एकदा याच आरोपांचा पुनर्रुच्चार केला आहे.
या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंची कामगिरी पाहिली तर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. त्यावेळी साखळीतील भारताविरुद्धची लढत पाकिस्तानने गमावली. त्यावेळी देखील हा सामना फिक्स असल्याचे मला समजले होते. मात्र, त्यानंतर संघाने खेळ उंचावला होता. तरीही बांगलादेशविरुद्धचा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. हा सामना देखील फिक्स झाल्याचे समजल्यावर मी वसिमची भेट घेतली. त्याने मात्र हा दावा फेटाळून लावला व आपण सामना जिंकू काळजी करू नका असे मला आश्वस्त केले, पण हा सामना देखील पाकिस्तान संघाने गमावला, अशी आठवणही सर्फराज यांनी सांगितली.
या स्पर्धेतील अंतिम लढत ऑस्ट्रेलियाशी झाली. त्यात पाकिस्तानला केवळ 132 धावाच करता आल्या. त्यातही त्यापूर्वीच्या सामन्यात सातत्याने फलंदाजी करणारे फलंदाज देखील अपयशी कसे ठरले याचे मला आजही कोडेच आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाने 21 व्या षटकात 8 गडी राखून जिंकला. या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना तसेच गोलंदाजांनाही अपयश आले. स्पर्धा झाल्यानंतर या सामन्याबाबत मी अनेकदा संशय व्यक्त केला होता. माजी कर्णधार व सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही मी चर्चा केली होती. मात्र, माझ्या बोलण्याकडे सर्व पातळ्यांवर साफ दुर्लक्ष केले गेले. उलट त्यांनी अक्रमलाच पाठिंबा दिला. या सगळ्याला अक्रमच जबाबदार आहे असे आजही माझे मत आहे, असेही सर्फराज यांनी सांगितले.
अक्रमने पुन्हा दावा फेटाळला…
सर्फराज यांनी केलेले आरोप व फिक्सिंग झाल्याचा दावा त्यावेळी अक्रमने फेटाळला होता. याबाबत जेव्हा चौकशी झाली त्यावेळी कमाइपेक्षा जास्त संपत्ती असल्याची कबुली अक्रमने दिली होती. मात्र, त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच त्याने इतकी संपत्ती कशी जमवली याचीही चौकशी झाली नाही. त्याला क्लिनचीट देण्यात आली होती. त्यावेळी त्याने सर्फराज यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता तसेच बिनशर्त माफी मागा असेही सांगितले होते. आता सर्फराज यांनी पुन्हा तेच आरोप केल्यानंतर आता अक्रम काय प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष राहणार आहे.