पिंपरी – “दिवाळीचा पहिला दिवा आज लागे दारी…”, असे म्हणत आनंद अन् उत्साह घेवून येणाऱ्या प्रकाशोत्सवाला धनत्रयोदशी व वसुबारसने आजपासून (शुक्रवार) सुरुवात झाली. पावसानेही हलक्या स्वरुपाची हजेरी लावल्याने शहरवासियांचा दीपोत्सवाचा आनंद दुणावला होता.
वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. मात्र, धनत्रयोदशी व वसुबारस एकाच दिवशी आली. भगवान धन्वंतरीच्या प्रकटीकरणाचा दिवस म्हणून धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा आहे. धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले होते तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता, अशी दंतकथा आहे. त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी नवीन खरेदी केल्याने धनामध्ये 13 पट वाढ होते असे म्हटले जात असल्याने खरेदीचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पहायला मिळाले. देवतांचे वैद्य असलेल्या धन्वंतरीना वैद्यशास्त्राचे देव मानले जाते. त्यामुळे डॉक्टरांनीही हा दिवस साजरा केला. व्यापारी वर्गातही धनत्रयोदशी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात आली.
पिंपरी-चिंचवडलगतच्या ग्रामीण भागात वसुबारसेला सवत्सधेनुची पूजा करीत वसुबारस साजरी करण्यात आली. पशूधन उपलब्ध असल्याने चिखली, चऱ्होली, रावेत, मोशी, दिघी, बोपखेल येथे वसुबारसचा उत्साह पहायला मिळाला. ग्रामीण भागातून शहरात आलेल्यांनी सवत्सधेनूच्या मूर्तीची पुजा करीत गावाकडील दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला.
गेले काही दिवस सतत पडणारा पाऊस, ढगाळलेले वातावरण आणि त्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम यामुळे दीपोत्सवाचा माहौल तयार झाला नव्हता. बाजारपेठा ओस पडल्या होत्या. दिवाळी काही तासांवर आली तरी पाऊस उघडीप देण्याचे नाव घेत नसल्याने शहरवासीय हैराण झाले होते. वातावरणात मरगळ आली होती. मात्र, दिवाळीचा पहिला दिवा आज लागणार म्हणून शहरवासीय सकाळपासून अंग झटकून दीपोत्सवाच्या तयारीला लागले. सकाळी हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु, दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे नागरिकांची खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती.