राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मागणी
नागपूर : राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागांची पाहणी झाल्यानंतर पवारांची माध्यमांशी संवाद साधला.
नागपूर परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, सोयाबिन, कापूस, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतीचे जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे केले. त्यांनी 44 हजार 213 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे सांगितले. मात्र वस्तूस्थिती पाहिल्यानंतर सरकारी आकडेवारीपेक्षा वास्तविक आकडेवारी अधिक असल्याचे पवारांनी सांगितले. सरकारने 33 टक्के नुकसान असेल तर पंचनामा करु असे सांगितले आहे. मात्र त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पवारांनी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ‘शेतकऱ्यांची बाजू केंद्रीय कृषी मंत्रालयासमोर मांडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार’, असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांचे नुकसान ऐवढे झाले आही की या संकटातून शेतकरी उठणार नाही, असे पवारांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांची बाजू केंद्रीय कृषी मंत्रालयासमोर मांडणार असून कर्जमाफीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जरी कर्जमाफी झाली तरी शेतकऱ्याला पुढच्या पिकासाठी भांडवल उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील ते म्हणाले. नुकसान भरपाईसाठी काय मदत करणार यासाठी जीआर काढणे आवश्यक असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.