नवी दिल्ली – केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला 26 जूनला सात महिने पूर्ण होणार आहेत. त्यादिवशी शेती बचाव, लोकशाही बचाव दिन पाळला जाणार आहे. त्यासाठी आणखी शेतकरी आंदोलनस्थळी दाखल होणार असल्याचे समजते.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी मागील वर्षीच्या 26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून आहेत. त्या आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चा करत आहे. आता आंदोलनाला सात महिने पूर्ण होत असल्याच्या दिवशी शेतकरी संघटनांकडून देशभरात निदर्शने केले जाणार आहेत. त्याशिवाय, दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनस्थळी पोहचण्यासाठी राजस्थान आणि उत्तरप्रदेशातील आणखी शेतकऱ्यांनी गुरूवारी कूच केले.
आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणारा भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांवर सामाजिक बहिष्कार टाकला आहे. त्यातून भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी आंदोलक ठाम आहेत. तर, ते कायदे मागे घेण्यास मोदी सरकारने स्पष्ट नकार दर्शवला आहे. त्यामुळे अनेक महिने होऊनही शेतकरी आंदोलनाची कोंडी कायम आहे.