पुणे : रेल्वे सुरक्षा दलाने एका प्रकरणात जप्त केलेला बैलगाडा शेतकऱ्याने न्यायालयीन लढा लढवून परत मिळविला. पुणे येथील रेल्वेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. राऊत यांनी याबाबतचा आदेश दिला.
नेताजी महादेव बंडगर (वय 37, रा. मिरज, जि. सांगली) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. बंडगर यांनी 2 जानेवारी रोजी बैलगाडा भाड्याने दिला होता. त्यावेळी तिघांना त्या बैलगाडातून रेल्वेची संपत्ती चोरताना अटक करण्यात आली.
त्यावेळी रेल्वे पोलिसांनी बैलगाडा आणि बैल जप्त केला होता. त्यामुळे बैलगाडा परत मिळावा, यासाठी बंडगर याने ऍड. श्रीकृष्ण घुगे, ऍड. शितल आवळे आणि ऍड. प्रियांका शितोळे यांच्यामार्फत येथील न्यायालयात धाव घेतली.
जप्त केलेल्या बैलाला चांगल्या परिस्थितीत ठेवायची सोय रेल्वे प्रशासनाकडे नाही. बैलाचा मूळ मालक बंडगर हे आरोपी नाहीत. भाड्याने देताना चोरीच्या कामासाठी बैलगाडा वापरण्यात येणार असल्याची माहिती त्यांना नव्हती. त्यांची त्या बैलगाडावर उपजिविका आहे. दैनदिन उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जप्त केलेला बैल आणि बैलगाडा सोडण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली. यावर न्यायालयाने बैलगाडा सोडण्याचा आदेश दिला.
याविषयी श्रीकृष्ण घुगे म्हणाले, बैल ही वस्तु नाही. प्राणी आहे. त्यामुळे जप्त करणे योग्य नाही. बैलाचे संगोपण करावे लागते. वेळेला चारा, पाणी द्यावे लागते. अन्यथा त्याच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. शेतकऱ्याला जप्ती झालेला बैलगाडा मिळविण्यासाठी मिरज येथून पुणे येथे सोडवावा लागला.