शेतकरी टिकला तर देश टिकेल असे आपण छातीठोकपणे सांगत असतो. पण तोच शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे. राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. अनेक महाबैठकीनंतर राजकीय संकटावर तोडगा निघाला. मात्र अश्याच बैठकी माझ्या शेतकऱ्यांच्या संकटावर झाल्या असत्या तर आज शेतकरी सुद्धा सुखी असता. आज राज्याला मुख्यमंत्री मिळाला. विरोधक सत्तेत आले तर सत्ताधारी विरोधात गेले. हे सर्व जनतेने पहिले. आता तेच विरोधीपक्ष म्हणून बैठका घेण्यात दंग झाले आहेत. मात्र माझा शेतकरी बाप सरकारी मदतीकडे पावसासारखा डोळे लावून बसला आहे.
एकीकडे पाऊस पडतोय आणि माझा शेतकरी बाप दुसरीकडे ओक्साबोक्सी रडत सरकारी मदत कधी येणार यांची चातकासारखी वाट पाहत कासावीस होत आहे. या निवडणुका खूप काही सांगून जाणाऱ्या ठरल्या यात काही तीळमात्र ही शंका नाही. गेली पाच वर्षे सरकार जुन्या योजनांची नाव बदलून त्याच जनतेसमोर आणण्यात यशस्वी झाल मात्र काही ठराविक योजना सोडल्या तर नवीन कोणत्या योजना सरकारने राबवल्या नाही. शेतीप्रश्नावर सरकार पूर्णतः अपयशी ठरल त्यामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या.राज्यात रोजगार घटला अनेक उद्योग राज्याबाहेर गेले.
आरक्षणाच्या लढाईत पाच वर्षे काढली. शेतकरी संप,किसान लॉंग मार्च सारखी आंदोलन चिरडून टाकली. माझ्यासारख्या सर्व सामान्य शेतकरी लेकींना खूप शिकायचं आहे मोठं डॉक्टर,इंजिनियर व्हायचं आहे. पण आमच पोट हे माझ्या शेतकरी बापाच्या शेतीवर आहे. आणि त्यातच आमचा शेतकरी बाप आमच्या दोन वेळच्या जेवणांसाठी कासावीस होतांना आम्ही पाहत आहे. त्यात आपण कुठून कसले स्वप्न बघायचे. कारण दोन वेळच्या जेवणासाठी आस्मानी संकटाशी लढत जगत असताना समोर दिसतं असतो तो शेतकरी बाप! त्यामुळे माझ्या शेतकरी बापासाठीच्या प्रत्येक योजना आमच्या शेतकरी बापांपर्यत अगदी शेवटपर्यंत पोहचलया पाहिजे. शेतमालाला हमीभाव मिळेल, अशी व्यवस्था केली पाहिजे.
-शर्मिला येवले
फर्ग्युसन महाविद्यालय