संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील दाढ खुर्द येथील नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी बंदीस्त गोठ्यावर हल्ला करुन दोन शेळ्या ठार केल्या. तसेच यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवरही हल्ला केला. परंतु ही महिला बालंबाल बचावली.
ही थरकाप घडविणारी घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी फोन उचलत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट वनमंत्र्यांनाच फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी तत्काळ कामाला लागवे व त्यांनी काही तासांतच या परिसरात पिंजरे लावले.
दाढ खुर्द शिवारात गट नंबर 143 मध्ये नानाभाऊ वाघमारे यांची वस्ती व बंदीस्त जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारी (दि. 8) रात्री 11.30 वाजेच्या सुमारास वाघमारेवस्तीवर सहा बिबटे शिकारीच्या शोधात दाखल झाले होते. या बिबट्यांना पाहून गोठ्यातील शेळ्यांनी मोठमोठ्याने ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे काय झाले, हे पाहण्यासाठी वाघमारे कुटुंबीय बाहेर आले असता, त्यांना गेट समोर दोन, मागील बाजूस दोन बिबटे, तर दोन बिबटे थेट आंब्याच्या झाडाचा आधार घेऊन बंदीस्त गोठ्यात शिरलेले दिसले.
एकदम सहा बिबटे दिसल्याने वाघमारे कुटुंबाचा थरकाप उडाला. यावेळी बिबट्यांनी दोन शेळ्या ठार करत एक शेळी गोठ्याबाहेर नेली. यावेळी बिबट्यांना हुसकावण्यासाठी वाघमारे कुटुंबीयाने आरडाओरडा केला. यावेळी एका बिबट्याने बबई वाघमारे या महिलेवर हल्ला केला. परंतु दैव बलवत्तर बिबट्याने मारलेल्या पंजामुळे केवळ साडी फाटली. मात्र बबई वाघमारे थोडक्यात बचावल्या.
वाघमारे कुटुंबाने आरडाओरड केल्याने परिसरातील शेतकरी त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे हे बिबटे तेथून पळून गेले. यावेळी नानाभाऊ वाघमारे यांनी संगमनेर वनविभागाला माहिती देण्यासाठी फोन केला. मात्र फोन उचलला न केल्याने वाघमारे यांनी थेट वनमंत्री संजय राठोड यांना फोन लावला.
तसेच त्यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गाभीर्य ओळखत वनमंत्र्यांनी थेट प्रशासकीय यंत्रणा हालवल्याने बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांसह अधिकाऱ्याचा फौज फाटा आज पहाटे अडीचच्या सुमारास वाघमारे यांच्या वस्तीवर दाखल झाला. अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
घटनेची माहिती मिळताच संजय भांड, राजेंद्र जमधडे, अविनाश जोशी, सतीश जोशी, सुधीर जोरी आदींसह स्थानिक ग्रामस्थ वाघमारे यांच्या वस्तीवर दाखल झाले. त्यांनी दहशतीखाली असलेल्या वाघमारे कुटुंबाला आधार दिला.
समूहाने सहा बिबटे फिरण्याची पहिलीच घटना
दरम्यान सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केल्याची संगमनेर तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच समूहाने हल्ला करणारे हे सहा बिबटे जेरबंद करण्याची मागणी भयभीत दाढ खुर्द ग्रामस्थांनी केली आहे.