गुवाहाटी – आसामात कोविड मुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रूपयांची मदत देण्याची महत्वपुर्ण घोषणा त्या राज्याच्या अर्थमंत्री अजंता नियोग यांनी केली आहे. आज त्यांनी राज्याचे नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक विधीमंडळात सादर केले त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
अशा प्रकारची योजना सुरू करणारे आसाम हे देशातील पहिले राज्य ठरले आहे असे त्यांनी म्हटले आहे. ज्या मुलांचे दोन्ही पालक करोनामुळे मरण पावले आहेत अशा मुलांना दर महा साडे तीन हजार रूपयांची मदत दिली जाणार असून ज्या घरातील कर्तापुरूष करोनामुळे मरण पावला आहे अशा घरातील विधवा महिलेला अडीच लाख रूपयांची एकरकमी मदत दिली जाणार आहे.
आसामात करोनामुळे 4888 प्रौढांचा मृत्यू झाला आहे. त्यात 1345 महिला आहेत. 18 वर्षाखालील 56 मुले यात दगावली आहेत. आसाम सरकारने 95 हजार 770 कोविडग्रस्तांना भोजन व्यवस्थेसह मोफत उपचार दिले अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.