विठ्ठल लांडगे
नगर – प्राथमिक शिक्षकांची नगर जिल्ह्यातील मुळ संघटना असलेल्या सदिच्छा मंडळात पुन्हा फूट पडली असून, निवडण्यात आलेली नवी कार्यकारिणीच मान्य नसल्याचे जाहीर करत अनेक नेत्यांनी “राजीनामास्त्र’ बाहेर काढले आहे. सदिच्छा मंडळाच्या सुरू झालेल्या या पडझडीस जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच संघटनांत फिरून आलेल्या एका नेत्याची चबढब कारणीभूत ठरत असल्याचा दावाही “सदिच्छा’तीलच काही शिक्षक नेत्यांनी दैनिक प्रभातशी बोलताना केला.
सदिच्छा मंडळ, नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळ, महिला आघाडी, पदवीधर व उच्चाधिकार समितीच्या जिल्हा कार्यकारिणींच्या निवडी अलीकडेच करण्यात आल्या. जामखेड येथे झालेल्या या निवडींमधून प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संगमनेर येथील माधव हासे व सदिच्छा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी जामखेड येथील नारायण राऊत यांची वर्णी लागली.
दरम्यान, नवीन कार्यकारिणी व पदाधिकारी निवडीतून संघटनेतील किमान चाळीस टक्के सदस्य नाराज झाल्याचे शिक्षक नेते गोकुळ कळमकर यांनी सांगितले. अनेक नाराजांनी तत्काळ राजीनामे दिले. तथापि, ही माहिती अजून उजेडात आलेली नाही. मात्र, सध्याच्या एका कथित नेत्याकडून होणारी संघटनेची
पडझड थांबवावी लागेल. त्यासाठी राजीनामा देण्याची भूमिका घ्यावी लागत असल्याचे ते म्हणाले. खरेतर सदिच्छा मंडळाला ज्यांनी कायम विरोध केला, तेच सध्या “सदिच्छा’चे नेते आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. ऐक्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वीच सदिच्छा मंडळावर तोंडसुख घेतलेले आहे. नंतर ऐक्य सोडून ते स्वत:च सदिच्छा मंडळात डेरेदाखल झाले. नेत्यांशी वाद करुन बाहेर पडले आणि गुरुकुल मंडळात गेले.
गुरुमाऊली मंडळाच्या निर्मितीलाही तेच कारणीभूत ठरले. पुन्हा सदिच्छा मंडळात दाखल झाले. तरी त्यांना नेता म्हणूनच मूळ “सदिच्छा’ प्रेमींनी स्वीकारले. मात्र, आता ते संघटना व मंडळ स्वत:च्या व त्यांच्यासोबत असलेल्या मूठभर लोकांच्या फायद्यासाठी चालवित असल्याचे स्पष्ट चित्र समोर आल्याने नाईलाजास्तव संघटनेतील पदे सोडावी लागत असल्याची माहिती त्यांनी दिली.
संघटना पारदर्शी व सर्वसमावेशक असायला हवी. सध्या ज्यांनी संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातील दोघा-तिघांनीच कुठेतरी बसून नवी कार्यकारिणी ठरविली. विशेष म्हणजे संघटना उभी करण्यात ज्यांची हयात गेली, ते ज्येष्ठ शिक्षक नेते विष्णूदादा खांदवे यांचेही या कथित नेत्यांनी नव्या निवडीत काहीच ऐकले नाही, हे खूप दुर्दैवी.
त्यामुळे नाईलाजास्तव पदाचा राजीनामा द्यावा लागत आहे. अर्थात मी “सदिच्छा’तच काम करणार आहे. कारण माझा जन्मच सदिच्छात झाला. येथेच निवृत्त होईल. मी अनेक संघटना फिरून आलेलो नाही.
गोकुळ कळमकर
राज्य प्रतिनिधी, प्राथमिक शिक्षक संघ.