कोल्हापूर/ प्रतिनिधी – तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. असे आश्वासन दिले. सत्तेत आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या हजारो बैठका झाल्या मात्र आरक्षणाच्या विषयाचा त्यांना विसर पडला. त्यामुळे या समाजाची फसवणूक फडणवीस सरकारनेच केली आहे. असा आरोप करत महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाला न्याय मिळवून देईल. असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने आरक्षण अमलबजावणी करा या मागणीचे निवेदन सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी बबनराव रानगे, कृष्णात पुजारी, प्रा. शंकर पुजारी, प्रा. राजेंद्र कोळेकर आदी उपस्थित होते.
हसन मुश्रीफ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी एक नव्हे हजार कॅबिनेट बैठका झाल्या तरी धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा प्रलंबित प्रश्न सोडवला नाही. परंतु महाविकास आघाडी सरकार योग्य निर्णय घेईल. दरम्यान जिल्हयातील धनगर समाजातील सर्व संघटना आरक्षण मुद्दयावर एकत्र आल्या असून जिल्हा धनगर समाज समन्वय समितीची स्थापना केली आहे. समितीच्या वतीने तात्काळ आरक्षण अंमलबजावणी करा.
या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे दिले. धनगर समाजाला आरक्षण मिळावे. ही सर्वच राजकारण्याची इच्छा आहे. मात्र सत्तेत गेल्यानंतर सर्वांनाच या समाजाचा विसर पडतो. तात्काळ अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणी करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ही या निवेदनात देण्यात आला आहे.
या शिष्टमंडळात राजेश तांबवे, मच्छिंद्रनाथ बनसोडे, बयाजी शेळके, छगन नांगरे, प्रा. लक्ष्मण करपे, राघू हजारे, महादेव सनगर, तम्मा शिरोले, डॉ. संदीप हजारे, बाबूराव रानगे, राजेश बाणदार, यांचा सहभाग होता.