पारनेर – केंद्र शासनाने सरसकट निर्यातबंदी हटवावी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी संपर्क करून तातडीने निर्यातबंदी हटवून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून बाजार भाव नसल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे कांद्याला गेल्या दोन-तीन महिन्यांत बऱ्यापैकी बाजारभाव मिळत होता. त्यामुळे शासनाने मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळे निर्यात बंदी केली आहे. मात्र सध्या बाजारामध्ये येणारा कांदा हा खरीप हंगामातील असल्यामुळे त्याची साठवणूक करता येत नाही. त्यात भावही कमी होत आहेत.
यावर्षी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून चालू रब्बी हंगामात कांदा उत्पादन 32 लाख टनांनी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.त्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पवार यांनी यावेळी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून सध्याची कांदा परिस्थिती भाव कमी झाल्यामुळे अतिशय गंभीर आहे. त्यासाठी लवकरात लवकर शासनस्तरावर उपाययोजना कराव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, अशी मागणी केली.