नवी दिल्ली – विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत मिळालेल्या रजतपदकाने आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अत्यंत मोलाचा अनुभव मिळाला आहे. आता टोकियोतील पदकाचा दावा आणखी भक्कम झाला असून यंदा ऑलिम्पिक पदकावर मोहोर उमटवणारच, असा विश्वास भारताची अव्वल नेमबाज राही सरनोबतने व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकच्या दृष्टीने सराव तसेच विविध स्पर्धांमध्ये मिळत असलेला अनुभव खूप मोलाचा आहे. यंदा ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे व तत्पूर्वी विश्वकरंडक स्पर्धाही सुरू आहे त्यामुळे केवळ मलाच नव्हे तर सगळ्याच खेळाडूंना ऑलिम्पिकच्या दृष्टीने चांगला सराव मिळत आहे.
करोनाचा धोका सुरू झाल्यानंतर सगळ्याच स्पर्धा स्थगित झाल्या. त्यामुळे जवळपास दहा महिने घरातच बसून राहावे लागले. आता काही स्पर्धा सुरू झाल्या असून पुढील काळातही विविध स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वाचा सराव मिळत आहे. यंदा टोकियोत पदक जिंकूनच मायदेशात परतणार, असा विश्वासही राहीने व्यक्त केला.
करोनाचा धोका कमी झाल्यावर ही पहिलीच स्पर्धा आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सगळे खेळाडू आपपाल्या परीने स्पर्धांसाठी सज्ज होण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, प्रत्यक्ष सराव व रेंजच्या बाहेर होणारा सराव यात फरक असतो. त्यामुळे अशाच काही स्पर्धांमध्येही सहभागी होणार असून त्यातही सरस कामगिरी करण्यासाठी मेहनत घेणार आहे, असेही राहीने सांगितले.