शिष्यवृत्ती परीक्षेदरम्यानचा प्रकार ः दुसऱ्या पेपरवर झाला परिणाम
टाकळी हाजी – इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवार (दि. 16) पार पडली. यामध्ये इयत्ता 5 वी शिष्यवृत्तीच्या भाषा व गणित या विषयाच्या प्रश्नप्रत्रिकेमध्ये चुका आढळल्या. त्यामुळे परीक्षार्थी पुरते गोंधळून गेले होते.
इयत्ता पाचवीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाला दिलेल्या पर्यायात उत्तर नसणे, मुद्रणदोष, चुकीचा प्रश्न, प्रश्नात महत्त्वाचा शब्द न छापणे, आकृत्यांच्या बाबतीत तांत्रिक चुका, उत्तरात दोन समान पर्याय असणे, अशा चुका आढळल्या. वर्षभर नेटाने तयारी केलेले विद्यार्थी पहिल्या प्रश्नपत्रिकेतील चुकांमुळे परीक्षार्थी पुरते गोंधळून गेले. त्यामुळे पेपर सोडविण्याची मानसिकता बिघडली. त्याचा परिणाम दुसऱ्या पेपरवरही झाला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वर्षभराची मेहनत, मार्गदर्शक शिक्षक आणि शाळांनी नियोजनबद्ध पद्धतीने घेतलेला सरावावर यामुळे विरजण पडले आहे.
प्रश्नपत्रिकेत असणाऱ्या चुकांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. तसेच परीक्षा मंडळाने तज्ज्ञ शिक्षक व शिष्यवृत्ती तज्ज्ञांमार्फत अखेरची प्रत तपासणे गरजेचे आहे. विद्यार्थी या चुकीच्या प्रक्रियेमुळे गुणवत्ता यादीपासून वंचित राहू नये हीच अपेक्षा.
– संतोष थोपटे, अध्यक्ष, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ.
दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेत चुका झाल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक वर्षभर कष्ट करून त्यांचा पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. परीक्षा परिषदेने योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे.
– शिवाजीराव वाळके, अध्यक्ष, अखिल शिक्षक संघटना
परीक्षा मंडळ परीक्षेनंतर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी शोधणे, त्याबाबतीत निर्णय घेणे यासाठी तज्ज्ञांची समिती नेमेल. परंतु मागील वर्षीचा अनुभव जमेस धरून प्रश्नपत्रिका निर्दोष कशा होतील. यासंबंधी पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे. परीक्षा देणारे विद्यार्थी, वर्षभर तयारी करून घेणारे शिक्षक आणि पालकांच्या मानसिकतेचा विचार करून अशा अक्षम्य त्रुटी टाळणे शैक्षणिक गुणवत्ता विकासाच्या दृष्टीने नक्कीच महत्त्वाचे आहे.
– अनिल पलांडे, मार्गदर्शक, शिष्यवृत्ती परीक्षा