सातारा – उच्च माध्यमिक (बारावी) प्रमाणपत्र परीक्षा मंगळवारपासून (दि. 21) जिल्ह्यातील 51 परीक्षा केंद्रावर सुरु होणार आहे. या परीक्षेसाठी 36 हजार 87 विद्यार्थी बसले असून परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला असल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 21 मार्च अखेर होणार आहे. महाबळेश्वर तालुक्यात 2, जावळी 2, खंडाळा 3, वाई 4, फलटण 5, कोरेगाव 3, सातारा 9, कराड 13, पाटण 2, माण 4, खटाव 4 अशा 51 केंद्रावर सुमारे 36 हजार 87 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज झाला असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रातील सर्व विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रात व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.
परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागामार्फत बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना व पालकांना मदतीसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आल्याचे कोळेकर यांनी सांगितले. पाच भरारी पथकांची नियुक्ती बारावी परीक्षेसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे प्राचार्य, माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, योजना विभागाचे शिक्षणाधिकारी अशी 5 भरारी पथके नेमण्यात आली असून ती विविध केद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवली जाणार आहेत. परीक्षा सुरळीत व सुरक्षित वातावरणात पार पाडून गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचवणाऱ्या रनर यांना जीपीएस लाईव्ह लोकेशनद्वारे ट्रॅक केले जाणार आहे. कॉपीमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेची अंमलबजावणी कडक होणार असल्याचे प्रभावती कोळेकर यांनी सांगितले.