बंद होणारची चर्चा ठरली पोकळ…
पुणे – शासकीय पदभरतीवरून चर्चेत असलेले महापरीक्षा पोर्टल अखेर बंद होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पोर्टल अंतर्गत विविध पदांसाठी त्रयस्त यंत्रणेद्वारे ऑनलाइनद्वारेच परीक्षा होणार असल्याचे आज प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयावरून स्पष्ट झाले. त्यामुळे लाखो उमेदवारांचे लक्ष असलेल्या महापरीक्षा पोर्टलवरील नव्या निर्णयावरून संतापाची लाट उसळली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यात महापरीक्षा पोर्टल बंद होणार असल्याचा कोणताच उल्लेख नाही. पोर्टलद्वारे होणारी सर्व परीक्षा आता शासनाच्या त्या-त्या विभागाकडून होणार आहेत. तेही निविदाद्वारे त्रयस्त यंत्रणा नेमून, त्याद्वारे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. सरकारी पदभरतीसाठी परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी शासनाच्या आयटी विभागाने महापरीक्षा पोर्टलला दिली.
महापरीक्षा पोर्टलने त्यासाठी खासगी आयटी कंपन्यांची नेमणूक करून, या परीक्षा प्रत्यक्षात पार पाडण्याची जबाबदारी दिली. मात्र, या परीक्षांमध्ये सुरुवातीपासून गैरप्रकार आणि गोंधळ सुरू आहे. या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांद्वारे गैरप्रकार झाल्याचे सातत्याने आरोप करण्यात आले. परीक्षेला अनुपस्थित असणाऱ्यांचे नाव निवड यादीसाठी शिफारस करणे, परीक्षा केंद्रांवर मास कॉपी करणे, ब्ल्यू-टूथ हेडसेट व कॅमेरा वापरून हायटेक कॉपी करणे असे प्रकार राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर महापरीक्षा पोर्टलच्या गैरकारभाराच्या विरोधात; तसेच प्रामाणिक उमेदवारांवर होणाऱ्या अन्यायामुळे उमेदवारांनी राज्यभर मोर्चे काढले. या सर्वांची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना स्थगिती दिली. यातूनच सर्वांनी हे पोर्टल बंद करण्याबाबत आग्रह धरला आहे.
उमेदवार आंदोलनाच्या पुन्हा पवित्र्यात…
महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करावी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व सरकारी पदांसाठी परीक्षा घेण्यात यावी, अशी आमची मागणी होती. त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे योग्य माहिती दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रभर आंदोलन, मोर्च काढूनही योग्य निर्णय न घेतल्याने आता पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी दिली आहे.