महाड – मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. रायगड, रत्नागिरी, चिपळूण आणि महाड या भागांमध्ये प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. रायगड आणि साताऱ्यात दरडी कोसळून आतापर्यंत अनेकांचा जीव गेला आहे.
महाड तालुक्यातील तळीये गावात 35 घरांवर दरड कोसळून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत 38 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेत भारतीय सैन्यातील जवानाचं अख्ख कुटुंबच संपल आहे. जवान अमोल कोंडाळकर यांच्यासोबत नियतीने क्रुर थट्टा केली असून त्यांचे आई-बाबा, बहीण आणि बायको या दुर्घटनेत दगावली आहे.
अमोल कोंडाळकर हे वरिष्ठ पदाच्या ट्रेनिंगसाठी पुण्यात आहेत. त्यामुळे या दुर्दैवी घटनेतून बचावले आहेत. गेल्याच वर्षी अमोल यांचं लग्न झालं होतं. मात्र कोसळलेल्या दरडीने अमोल यांना एकट करून टाकलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट देऊन येथील गावकऱ्यांचं सांत्वन केलं.