पुणे : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देशात केंद्रीय शिक्षण मंडळाह बहुतांश राज्यातील शिक्षण मंडळांनी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बारावी परीक्षेचा निर्णय जून महिन्यात घेण्यात येणार आहे. त्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईने दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाच्या काळात यावर्षीच्या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया पार पडली. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकीच्या प्रवेशाला जुलै महिना उजाडणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने शैक्षणिक वर्ष 2021-22साठी 31 ऑगस्ट रोजी पहिली प्रवेश फेरी पूर्ण करावी आणि 15 सप्टेबरपासून कॉलेज सुरू करावे असे वेळापत्रक दिले आहे. परंतु देशातील करोनाची सध्याची स्थिती पाहता वेळापत्रकानुसार प्रवेशप्रक्रिया होणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.
यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली, तर बारावी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विविध राज्यात हीच परिस्थिती आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्यास जूनमध्ये ह्या परीक्षा होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल, त्यानंतर अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा होईल. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होण्याची चिन्हे आहेत. सध्याची करोनाची स्थिती पाहता ही प्रवेशप्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर पडेल, असेच चित्र आहे. त्यामुळे 15 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे.
परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर करावे
बारावी परीक्षांबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने
वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. मागील वर्षीही कोरोनाची स्थिती लक्षात घेता अनेक वेळा परिषदेला वेळापत्रक बदलावे लागले होते. यंदा मात्र परिस्थिती अधिकच बिकट आहे. त्यामुळे परिषदेने दिलेले वेळापत्रक मागे घेऊन शिक्षण व्यवस्थेवरील ताण कमी करावा तसेच सुधारित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांतून होत आहे