लाखणगाव (वार्ताहर) –आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील मेकॅनिकल इंजिनिअर पांडुरंग राऊत हे रांजणगाव या ठिकाणी औद्योगिक वसाहतीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद असल्याने त्यांनी आपला पारंपरिक कुंभार व्यवसाय सुरू केला आहे.
पांडुरंग राऊत यांच्याप्रमाणे चांगले शिक्षण असूनही अनेक तरुणांना कंत्राटी कामगार म्हणून काम करावे लागते. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद असल्याने सर्व कामगार आपल्या घरी आले आहेत. अजून कंपनीकडूुन पगाराबाबत कुठल्याच प्रकारची माहिती आलेली नाही. पांडुरंग राऊत सध्या आपला पारंपरिक कुंभार व्यवसाय करत आहेत. हा व्यवसाय उन्हाळ्याच्या दिवसात चांगला चालतो.
थंड पाण्यासाठी माठांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. उन्हाळ्यापुरता चालणाऱ्या या व्यवसायावर वार्षिक आर्थिक नियोजन अवलंबून असते; परंतु उन्हाळ्यातच करोना व्हायरस फैलावामुळे मातीच्या माठांना मागणी नसल्याने तयार केलेले माठ घरात पडून आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
परिणामी नोकरीतून मिळणाऱ्या पगाराची काही प्रमाणात शाश्वती असते. आणि पारंपरिक व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत शाश्वती नसल्याने राऊत यांसारख्या अनेक कुटुंबांवर आर्थिक अडचण निर्माण झाली असून शासनाने अशा तरुणांना रोजगार भत्ता सुरू करावा, अशी मागणी होत आहे.