कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा पाया भक्कम करणारे, बहुजन समाजाचा आधारस्तंभ म्हणून राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची ओळख संपूर्ण राज्यासह देशभरात आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना आधार देण्याचे काम साहेबांनी केले आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखे हजारो कार्यकर्ते साहेबांनी घडविले आहेत. या शिदोरीवर राष्ट्रवादी आणि साहेबांची वाटचाल सुरू आहे.
निष्ठावंतांना बळ देण्याचे काम केले आहे. त्यांच्यात व्यापक दूरदृष्टी ओतप्रोत भरली आहे. पुरंदरसारख्या गावगाड्यातून आलेल्या आणि नेतृत्वक्षमता असलेल्यांना हेरून अनेकांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. साहेबांचा प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती निष्ठावंतांसाठी ऊर्जा देणारी ठरत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सासवड येथील अजित नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शामकांत भिंताडे यांनी व्यक्त केलेली शब्दबद्ध प्रतिक्रिया…
शामकांत भिंताडे, अध्यक्ष
अजित नागरी सहकारी पतसंस्था, मर्यादित सासवड.
पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील शामकांत भिंताडे हे सर्वसामान्य कुटुंब. मी प्राथमिक शिक्षणानंतर उरूळी कांचनमध्ये आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पिंपरी येथे टेल्को कंपनीत नोकरीत रूजू झालो. तो काळ होता 1982चा. काम करताना कामगार संघटनेत समरूप झालो. त्यावेळी उपजत गुण आणि सर्व सहकाऱ्यांमध्ये समन्वय साधून कामगार चळवळीत एकसंधपणा आणला. पदाधिकारी म्हणून करताना युनियनच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यातून कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम केले. कामगारांचे नेतृत्व करताना शरद पवार साहेब यांच्याविषयी एक आकर्षण आणि जिव्हाळा होता.
औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असताना राजकारणात नकळतपणे प्रवेश झाला. कामगारांसाठी पिंपरी ते सासवड, अशी टेल्को कंपनीची बससेवा सुरू केली. तरूणांना आयटीआयचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. पुरंदर तालुक्यातील तीनशे तरूणांना टेल्को कंपनीत नोकरीसाठी मार्गदर्शन केले. तरूणांना मुख्य प्रवाहात आणले. राज्यभरातून एक हजार तरूणांना नोकरीसाठी दिशा दिली. विजयअण्णा कोलते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सदाअण्णा झेंडे, माजी उपसभापती लक्ष्मण चव्हाण, दादा भगत, दिलीपभाई बारभाई यांच्यासह अन्य तालुका पातळीवरील नेत्यांनी बळ दिले. त्यामुळे तत्कालीन युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष झालो. त्यामुळे खऱ्या अर्थाने बळ मिळत गेले. गावागावांत पक्षसंघटना मजबूत केली. तालुक्यात 55 शाखा वाढविल्या. सर्वसामान्यांपासून ते तरूणांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणले. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि त्यांचा आदर्श सुखावणारा ठरला.
पुरंदर तालुक्यात साहेबांशी संपर्क आला. त्याचवेळी गावगाड्यातील माणसाविषयी आस्था, त्यांचे प्रश्न त्यांनी हिरीरीने हाताळले. तडीस नेले. पुरंदरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांपासून ते तालुकापातळीवरील निष्ठावंत नेत्यांना बळ दिले. हीच शिदोरी सर्वसामान्यांना आधार देणारी ठरत आहे.
पवार साहेबांनी दुष्काळी पुरंदर तालुक्याला गती दिली आहे. जेजुरी एमआयडीसी, पुरंदर उपसा जलसिंचन योजना आदी प्रश्न धडाधडीने मार्गी लावले आहेत. आम्ही एकदा दुष्काळी तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, या मागणीसाठी साहेबांना साकडे घातले. पाणीप्रश्न मिटला नाही तर पुरंदरचा शेतकरी तालुक्याबाहेर जाईल, असे सांगितले. त्यावेळी आयोजित सभेत पुरंदरची जनता, शेतकरी तालुक्याबाहेर कशाला जाते, मी पाण्यालाच पुरंदरला आणतो, असा आत्मविश्वास साहेबांनी शेतकऱ्यांना दिला. साहेबांनी पुरंदर उपसा जलसिंचन योजना ही तालुक्यात आणली. पुरंदरच्या पूर्व भागातील शेतीचे नंदनवन झाले. यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता. इतकी दूरदृष्टी राज्यातील अन्य नेत्यांमध्ये नाही. पवार साहेबांनी मला स्नेह, आपुलकी दिली. अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही हे तत्व अंगीकारले आहे.
सासवडमध्ये अजित नागरी पतसंस्थेची स्थापना केली. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. भिवडी येथे उमाजी नाईक हायस्कूल उभारून विद्यार्थी- विद्यार्थिनींना ज्ञानमंदिरे खुली केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षवाढीसाठी झोकून देऊन काम केले. त्याच दरम्यान, अर्धांगवायूचा झटका आला. त्या परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानसिक आधार देऊन बळ दिले. राष्ट्रवादीच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याला बळ कसे द्यायचे, याचे उदाहरण राष्ट्रवादीत अर्थात पवार साहेब यांच्या कृतीतून दिसत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा.
शब्दांकन : अमोल बनकर (सासवड प्रतिनिधी).