बाणेर, बालेवाडी परिसरातील 50टक्के हॉटेल्स् कायमची बंद
– अभिराज भडकवाड
औंध – बाणेर, बालेवाडी ही उपनगरं वेगाने विकसित झाली. यामुळे हा परिसर विविध व्यावसायिकांसाठी उलाढालीचे केंद्र बनला. सॉफ्टवेअर कंपन्या असल्यामुळे खर्चिक ग्राहकांची येथे कमी नव्हती. यातून या भागातील उलाढालही मोठी होती. पुण्यातील खवय्येही चमचमीत जेवण तसेच पार्टीसाठी या परिसरात येत असत. गेल्या काही वर्षांत या परिसरामध्ये बार, पबची संख्या वाढली होती. आयटीमधील नोकरदार युवा वर्गाची गर्दी “विकेंड’ला हाय स्ट्रीट सारख्या भागांत ओसंडून वाहत होती. येथील सर्व हॉटेल्स भरलेली असायची परंतु, करोना आणि त्यामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर येथील हॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला असून अनेक हॉटेल्स् कायमची बंद झाली आहेत.
पुणे शहराचे आयटी हब असलेल्या बाणेर, बालेवाडी परिसरात सर्वाधिक उलाढाल होत होती ती हॉटेल व्यवसायात. परंतु, मार्च महिन्यांत लॉकडाऊन झाल्यानंतर येथील व्हेज, नॉनव्हेज, रेस्टारंट, बार, पब अशी सर्वच प्रकारची हॉटेल्स् बंद पडली आहेत. पार्सल सुविधा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिले असली तरी ग्राहकांकडून अतिशय कमी प्रतिसाद आहे.
ज्या हॉटेलचा रोजचा दिवसाचा व्यवसाय 1 ते दीड लाखांपर्यंत होत होता तो आता दिवसाला 10 हजारापर्यंत कसाबसा होतो. हॉटेलातील कुकला लॉकडाऊनच्या काळातही किमान 10 ते 15 हजार रुपये द्यावे लागतात तसेच अन्य खर्च जाता हॉटेल मालकांच्या हाती काहीच उरत नसल्याने अनेकांनी आपली हॉटेल बंद केली आहेत. बाणेर, बालेवाडी परिसरातील जवळपास 50% हॉटेल्स पूर्णत: बंद पडली आहेत तर आणखी काही हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
बाणेर, बालेवाडीतील काही “फेमस’ हॉटेल्स् भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत आहेत. या जागेला दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत मासिक भाडे आहे. त्यातही, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्च पाहिला तर पार्सल सुविधेवर हा व्यवसाय चालविणे कठीण जात आहे. करोनावरील लस, औषध बाजारात आले तरी जेवणासाठी ग्राहक बाहेर पडतीलच, याची शाश्वती नाही तसेच अशा परिस्थितीत हॉटेल सुरू केले तरी सुरक्षिततेची उपाय म्हणून हॉटेलमधील आसन व्यवस्था बदलण्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. यावर पुन्हा लाखो रुपये खर्च करण्याची हॉटेल व्यावसायिकांची मानसिकता नाही.
“ते’ लोक निघाले मूळगावी…
हॉटेल व्यवसाय करावा तर तो “त्याच’ लोकांनी.., असे म्हटले जाते. परंतु, हॉटेल व्यवसायात गेली कित्येक वर्षे मुरलेले हे लोकही लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय कायमचा बंद करून आपल्या मूळगावी निघाले आहेत. हॉटेलमधून फक्त पार्सल विक्री सुरू ठेवण्यात आली तरी करोनाच्या भीतीने हॉटेलात ग्राहक येत नाहीत. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळले जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीने व्यवसाय करण्याची मानसिकता त्या लोकांची नाही. यामुळे हॉटेल व्यवसायात मातब्बर समजले जाणारे लोकही आता हा व्यवसाय बंद करून मूळगावी निघाले आहेत.