पिंपरी (प्रतिनिधी) -आजच्या कलाकारांना लावणीचे लावण्य काय आहे याबाबत माहिती होणे गरजेचे आहे. आण्णाभाऊ साठेंच्या छक्कड लावणीतून लावणीचे लावण्य काय असते याची प्रचिती येते. अवघ्या दीड दिवस शाळेत गेलेल्या आण्णाभाऊंनी अनमोल साहित्याची निर्मिती केली. म्हणून साहित्यरत्न म्हणून त्यांची ओळख जगाच्या पाठीवर झाली, असे प्रतिपादन संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित गाथा लोकशाहिराची व कामगार पुरस्कार सोहळ्यामध्ये बोलतांना केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच, गुणवान कामगारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, महापौर राहुल जाधव यांच्यासह सदाशिव खाडे, विलास मडेगिरी, अमित गोरखे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शितल शिंदे, सचिन चिखले, भानुदास नेटके, माऊली थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.