नवी दिल्ली -जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल जी. सी. मुर्मू यांनी निवडणुकीच्या वेळेबाबत नुकतेच एक वक्तव्य केले. त्यावर निवडणूक आयोगाने मंगळवारी आक्षेप घेतला. निवडणूक वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आम्हाला आहे, असे एका निवेदनाद्वारे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
मागील वर्षी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली. त्यातील जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात असेल. त्या विधानसभेची निवडणूक केव्हा होणार याबाबत उत्सुकता आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे कार्य सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर, पुनर्रचनेची प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक होऊ शकते, असे मुर्मू यांनी म्हटले. मात्र, त्यांचे ते वक्तव्य निवडणूक आयोगाला रूचले नाही.