नवी दिल्ली – भारताची अर्थव्यवस्था केवळ तीन वर्षात म्हणजे 2024-25 मध्ये 5 लाख कोटी डॉलरची होईल आणि त्यानंतर केवळ 6 वर्षात म्हणजे 2030 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 10 लाख कोटी डॉलरचे होणार असल्याचा दावा केंद्रीय पेट्रोलियम आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केला आहे.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या निर्गुंतवणूकिबाबत बोलताना ते म्हणाले की, सर्व प्रक्रिया वेळापत्रकाप्रमाणे चालू असून लवकरच या कंपनीचे निर्गुंतवणूकीकरण करण्यात येईल. एअर इंडियाची विक्री यशस्वीरित्या झाली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यामुळे इतर निर्गुंतवणूक प्रकल्पांनाही चालना मिळणार आहे. इंधनाचा वापर वाढला असल्याचे सांगून ते म्हणाले की, पेट्रोलचा वापर करोनापूर्व काळापेक्षा 16 टक्क्यांनी तर डिझेलचा वापर 12 टक्क्यांनी वाढला आहे. यावरून अर्थव्यवस्थेला गती येत असल्याचे स्पष्ट होत आहे. मार्च 2020 पासून शेअर बाजार निर्देशांकांत 250 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.