– प्रमोल कुसेकर
मांडवगण फराटा – धरण क्षेत्रात संततधार पावसामुळे चासकमान धरण शंभर टक्के भरल्याने त्यातून डाव्या कालव्यातून विसर्ग सुरु होता. या वेळेस “टेल टु हेड’ अशा पद्धतीने पाण्याचे वाटप केले जाईल, असे आदेश शिरूरचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिले होता; परंतु त्यांच्या या आदेशाला पाटबंधारे खात्याकडून केराची टोपली दाखवली आहे. चासकमान धरणातून पाणी पहिल्यांदा टेलला असणाऱ्या शिरसगाव काटा, कुरुळी, कोळगाव डोळस, आंधळगाव, निर्वी या गावांना मिळणे अपेक्षित होते; परंतु या गावात पाणी आलेच नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
चासकमान धरणाची क्षमता 8.53 टीमसी आहे. महिनाभरात या धरणातून तब्बल 14 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे 17 जुलैपासून 550 क्युसेस वेगाने आवर्तन सोडण्यात आले होते; परंतु 25 जुलैपासून मुसळधार पावसामुळे 28 जुलैला धरणाचे पाच दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. 17 ऑगस्टला तो बंद करण्यात आला. तर कालव्याद्वारे 575 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु आहे; परंतु आमदार पाचर्णे यांच्या घोषणेप्रमाणे टेलला असणाऱ्या गावांना पाणी मिळविण्यासाठी अक्षरशः अधिकाऱ्यांपुढे लोटांगण घालायला लागत आहे.
निर्वी येथील तलावात पाणी सोडण्यात आले होते. परंतु ते लगेच बंद करण्यात आले. कोळगाव डोळस येथील शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरली तरच पाणी मिळेल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसे पाहता धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने यातील पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. त्या विसर्गात मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. तेच पाणी कालव्याद्वारे सोडून गाव तलाव भरून घेतले असते तर सर्व गावांची मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या सुटली असती, असे मत कोळगाव डोळस येथील ग्रामपंचायत सदस्य जनार्दन कोळपे यांनी व्यक्त केले.
आंधळगाव येथील तलावात 9 ऑगस्टला पाणी सोडण्यात आले होते; परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने कुठलेच सहकार्य केले नसल्याने तलावात सोडण्यात आलेले पाणी बंद केल्याचे पाटबंधारे खात्याचे अधिकारी गवळी यांनी सांगितले.
पाणीयोजना बंदच
भीमा नदीकाठी असणाऱ्या मांडवगण फराटा, वडगाव रासाई, रांजणगाव सांडस, नागरगाव, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला या गावांना पुराला सामोरे जावे लागले. तर त्यांच्या शेजारी असणाऱ्या आंधळगाव, कुरुळी, शिरसगाव काटा, पिंपळसुट्टी, कोळगाव डोळस, निर्वी या गावांना मात्र पुरेसा पाऊस न झाल्याने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या परिसरातील आंधळगाव, कोळगाव डोळस, निर्वी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहीरी या तलावांच्या शेजारीच असल्याने त्या मार्च महिन्यापासून बंद स्थितीत आहेत.
कोणाकडे दाद मागायची?
या पाणीपुरवठा योजनांना मोठ्या प्रमाणात खर्च करूनही त्या बंद असल्याने महिलांपुढे पाणी आणायचे कुठुन हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. टेल असणाऱ्या या सर्व गावांतील तलाव कोरडेच आहेत. चासकमानच्या पाण्यावर या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र अवलंबून असून आम्ही नेमकी पाण्याबाबत कोणाकडे दाद मागायची? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
निर्वी ग्रामपंचायतीने 26 जूनला तलावात पाणी सोडण्याबाबत आमदार बाबुराव पाचर्णे यांना निवेदन दिले होते. दहा दिवसांपूर्वी येथील तलावात पाणी सोडलेही होते; परंतु तेही आता बंद करण्यात आहे आहे. योग्य निर्णय न घेतल्यास लवकरच आंदोलन करण्यात येईल.
-सुनिता सोनवणे, सरपंच निर्वी
आंधळगाव येथील तलाव मागील 4 आवर्तनापासून वंचित आहे. तरी आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळावे. आमचा तलाव न भरल्याने पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
-सचिन भोसले, ग्रामस्थ आंधळगाव
विद्यमान आमदार हे गेल्या पाच वर्षांपासून पाण्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत. या भागात बाजरी व अन्य पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. विद्यमान आमदारांनी चासकमान शंभर टक्के भरलेले असताना आता पन्नास टक्के व पुढच्या आवर्तनात पन्नास टक्के असे भरले पाहिजे होते. भीमा नदीत विसर्ग करण्याऐवजी शिरूरच्या दुष्काळी भागातील तलाव भरले असते तर शेतकऱ्यांना भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले नसते.
-अशोक पवार, माजी आमदार
आलेल्या रोटेशनमध्ये 25 ते 30 टक्के येथील तलाव भरले असून, पंधरा दिवसानंतर पुन्हा चासकमान धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे. या भागातील सर्व तलाव शंभर टक्के भरले जातील. हे आवर्तन बेमुदत असणार आहे.
-बाबुराव पाचर्णे, आमदार शिरूर -हवेली