पुणे – अतिवृष्टी तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते आहे. अशा काळात शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देताना अडचणी येतात. त्यावेळी पंचनामे करणे कठीण असते. पण, डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे.
ई पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्याचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.
स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येणार असून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव सीतराम कुंटे, महसूल अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त व संचालक निरंजन सुधांशू, ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, काही वर्षांपूर्वी शेतकऱ्याला सात-बारा पाहायला मिळण्यासाठी खूप कष्ट लागत असे. पण आज सात-बारा मोबाइलमध्ये मिळतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करुन शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याबरोबरच त्यांना सोप्या आणि सुलभ पद्धतीने आवश्यक असणारी कागदपत्रे मिळवून देणे, पिकांची माहिती मिळवून देणे यावर भर देत आहोत.
एक जिल्हा एक पीक ब्रॅंड तयार व्हावा
विकेल ते पिकेल ही संकल्पना राज्यभरात राबवताना आपापल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य ओळखून एक जिल्हा एक पीक असा ब्रॅंड तयार करणे आवश्यक आहे तरच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाहीतर हमखास भाव मिळेल. शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला अधिक दिवस कसा टिकवता येईल, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.