महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोनही पक्ष संघटनांचे दसरा मेळावे चर्चेचा विषय झाला आहे. दोन्ही गटांनी आपापला मेळावा यशस्वी व्हावा आणि त्याला सर्वोच्च विक्रमी गर्दी जमा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्याला प्रचंड गर्दी जमणार यात शंका नाही, पण गर्दीचा नक्की अर्थ काय, हे मात्र आताच कळणार नाही. कारण, यामागचे गर्दीचे मानसशास्त्र समजून घ्यायला पाहिजे.
महत्त्वाचे म्हणजे ज्या प्रकारे ही गर्दी जमवली आहे त्यावरही अनेक वेळा हे मानसशास्त्र आणि त्याचा परिणाम अवलंबून असतो. सध्याची परिस्थिती बघता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अशा प्रकारचे बॅनर्सही मुंबईत ठिकठिकाणी दिसू लागले. तिकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटांमध्ये पन्नासच्या आसपास आमदार असल्याने प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील ठराविक गर्दी जरी मुंबईत आणून उभी केली, तरी ती प्रचंड असणार आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही. शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या भाजपने एकनाथ शिंदे यांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा जाहीर केला नसला तरी भाजपा कार्यकर्त्यांचाही एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा मिळणार, हे उघड आहे. हे दोन्ही मेळावे शिवसेनेच्या दोन गटांचे असले तरी या मेळाव्यासाठी जमणारी गर्दी मात्र विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची असू शकते.
दसरा मेळावा यावेळी होऊ नये म्हणून ज्या प्रकारे प्रयत्न करण्यात आले होते ते प्रयत्न न्यायालयाच्या निर्णयाने हाणून पाडल्यानंतर आता कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे. यानिमित्ताने आपापले शक्तिप्रदर्शन करण्याची संधी कोणताही गट सोडणार नाही, हे उघड आहे. आमदारांची संख्या सध्या कमी असली तरी मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमुळे उद्धव ठाकरे यांचा हा मेळावा मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो, तर एकनाथ शिंदेही आपल्या आमदारांना टार्गेट देऊन गर्दी जमवण्याचे सांगू शकतात. काही दिवसांमध्ये निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणाची, या प्रश्नाचे उत्तर जेव्हा जेव्हा दिले जाणार आहे तेव्हा अशा प्रकारचा मेळाव्यामधील गर्दीचे पुरावेही सादर केले जाऊ शकतात, याची कल्पना असल्याने दोन्ही गटांनी मेळाव्याची गर्दी सर्वात जास्त असावी यासाठी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे गर्दी जमवण्यामागील हे मानसशास्त्र असले तरी जी गर्दी जमते ती प्रत्यक्ष कोणाच्या पाठीशी उभी राहणार आहे, हे मानसशास्त्र मात्र कधीच कोणाला समजत नाही.
साधारणपणे देशात किंवा महाराष्ट्रात ज्या नेत्याच्या जाहीर सभेला नेहमीच गर्दी होते त्या नेत्याला निवडणुकीमध्ये यश मिळतेच असे नाही, असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा महाराष्ट्रात कोठेही झाली तरी हाउसफुल गर्दी लोटते; पण त्या गर्दीचे यशामध्ये रूपांतर होत नाही, हे वास्तवही लक्षात घ्यायला हवे. राजकीय नेत्याची सभा आहे, त्याचे भाषण ऐकण्यासाठी त्याच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित राहतात, असे नाही. तर या पक्षाचे ज्ञान असणारा किंवा पक्षाच्या विचारांशी बांधिलकी नसणारेसुद्धा अनेक लोक जाहीर सभेला हजर असतात. त्यांना फक्त हा नेता काय बोलतो हेच ऐकायचे असते. उद्धव ठाकरे असोत की एकनाथ शिंदे, ज्यांच्या नेतृत्वाखाली जास्त गर्दी जमली त्या गटाने तात्पुरती बाजी मारली, असे समजा. प्रत्यक्ष महिन्याभराने होणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये या गर्दीच्या मानसशास्त्राचा खरा अर्थ समोर येणार आहे. ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या मेळाव्याच्या व्यासपीठावर कशा प्रकारे आपली भूमिका मांडतात हे सर्वात जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गेल्या काही दिवसातील जाहीर सभा किंवा जाहीर कार्यक्रमातील भाषणांवर नजर टाकली तर त्यांनी नेहमीच आपल्या सरकारने अल्पकालावधीत काय काय केले यावरच भर दिला आहे. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा आम्हीच जपत आहोत हे जाणीवपूर्वक बिंबवण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून केला जातो. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांना मात्र शिंदे यांच्या गटाने केलेली गद्दारी याच विषयाला हायलाइट करून आपल्या भूमिका मांडाव्या लागणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचे वर्णन नेहमीच “टोमणे मारणे’ अशा प्रकारे केले जाते. उद्धव ठाकरे यांची भाषणाची शैली ही खरी आणि कोटी बाज असल्याने ते नेहमीच नाव, आडनाव किंवा इतर अनेक गोष्टींचा आधार घेऊन कोट्या करत असतात. तर टोमणेही मारत असतात.
शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात आणि संसदीय पक्षात पडलेली फूट हे एक वास्तव असल्याने आता उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांना पुन्हा चार्ज करण्यासाठी या व्यासपीठावरून आपली भूमिका मांडावी लागणार आहे. पुढे होणारी अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक असो की, त्यानंतर काही कालावधीने होणारी मुंबई महापालिका आणि इतर महापालिकांच्या निवडणुका असोत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यश मिळवायचे असेल, तर शिवसैनिकांची मानसिकता सकारात्मक करावी लागणार आहे. त्यासाठी अशा प्रकारच्या दसरा मेळाव्याची व्यासपीठे महत्त्वाची ठरतात. विशिष्ट असा संदेश देऊन आणि विशिष्ट कामाची दिशा देऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना चार्ज करू शकतात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कालावधीपासून शिवसेनेचा दसरा मेळावा हा एक उत्सुकतेचा विषय असतो. प्रत्येक वर्षी या मेळाव्याच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेसाठी एखादी वेगळी मार्गदर्शक सूचना जारी केलेली होती. आता यावेळीसुद्धा उद्धव ठाकरे शिवसैनिकांसाठी कोणता रोडमॅप देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील किंवा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाचा दसरा मेळावा असो हे दोन्ही उपक्रम शांततेने पार पडतील, अशी आशा करायला हवी.