नवी दिल्ली : कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी सध्या जगभरात लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावाही केला होता. यातच योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते. त्यानंतर या औषधावरून अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे आता पतंजली योगपिठाने आपल्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे. कोरोनिल हे औषध उपचारासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे असल्याचे पतंजलीकडून सांगण्यात आले आहे.
आचार्य बालकृष्ण यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ‘क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर जो निष्कर्ष आला तो आम्ही संपूर्ण देशाला सांगितला. आम्ही असं म्हणालो नाही की, हे औषध कोरोनावर उपचार म्हणून वापरलं जाऊ शकतं. आम्ही असं म्हणालो होतो की, या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल दरम्यान, कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. यामध्ये काहीच शंका घेण्यासारखं नाही.’ असेत्यांनी यावेळी म्हटले.
तसेच ‘अनेकांचे असे म्हणणे आहे की, क्लिनिकल ट्रायल खोटं आहे. कोणी म्हणते आम्ही केलेला दावा खोटा आहे. आम्ही कधीच नाही म्हणालो की, आम्ही कोरोनाचे औषध तयार केलं आहे. आम्ही हे म्हणालो की, ‘आम्ही तयार केलेल्या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये कोरोनाचे रुग्ण बरे झाले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, 23 जून रोजी पतंजलीचे योगगुरु बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी रामदेव बाबा यांनी, संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेले पहिले आयुर्वेदिक औषध असल्याचा दावा केला होता. मात्र त्यांच्या या दाव्यावरून देशात अनेक वाद निर्माण झाले होते. तसेच राजस्थान आणि महाराष्ट्रात या औषधावर बंदी देखील घालण्यात आली होती. या सर्व घडामोडी नंतर आता पतंजलीने आपल्याच दाव्यावरून माघार घेतली आहे.