शिरूर : भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर नजीक बोऱ्हाडे मळा येथे घडली आहे. गणेश बळीराम विखे (वय 24, रा.सोनविहिर,ता. शेवगाव, जि.अहमदनगर) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मनोहर बाबासाहेब घोरतळे (वय 32 रा. बोधेगाव, तालुका शेवगाव, जि. अहमदनगर) याने माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरनजीक बोऱ्हाडे मळा येथे होटेल वैभवजवळ रस्त्यावर असलेले पाणी कारच्या काचेवर पडल्याने कार चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला गेलेल्या कारची ट्रक ला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातामध्ये २४ वर्षीय तरुण ठार झाला आहे. धडकेच्या आवाजाने स्थानिक नागरिक मदतीसाठी गोळा झाले होते. परंतु, कार ट्रक च्या मध्यभागी अडकल्याने अडीच ते तीन तासाच्या प्रयत्नानंतर ट्रकमध्ये अडकलेली कार बाजूला काढून कारमधील चालकाचा अस्तव्यस्त मृतदेह बाहेर काढण्यात आला.
शिरूर पुणे महानगर महामार्गावर रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे हा अपघात झाल्याचे काहींचे म्हणणे आहे .या अपघातामुळे नगर- पुणे रस्त्यावरची वाहतूक काही तास खोळंबली होती. महामार्गावरील अनेक ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचत असून यामुळे असे भीषण अपघात होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
याप्रकरणी पुढील तपास शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक डी.आर.थेऊरकर करीत आहेत .