औरंगाबाद – केंद्र सरकारच्या अग्नीवीर सैन्य भरतीच्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणी दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नामदेव पवार (वय 20, विठ्ठलवाडी, ता. कन्नड) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. औरंगाबाद येथे अग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांची भरती सुरु आहे. याभरतीसाठी नामदेव औरंगाबाद येथे आला होता.
कन्नड तालुक्यातील नामदेव पवार 1600 मीटर धावण्याची चाचणी देत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमीनीवर कोसळला. तेथे उपस्थितांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याला तातडीने शहरातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने कन्नड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सैन्य दलात भरतीसाठी नामदेव अनेक दिवसांपासून सरावही करत होता. सैन्यात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते.