शेअर बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता पूर्वी ठरवलेली अनेक महत्त्वाची उद्दीष्टे आपण गुंतवणूक सुरुच ठेवून साध्य करणार आहोत ना? गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय आपल्या आर्थिक उद्दीष्ट पूर्ततेमध्ये मोठा अडसर निर्माण करणार नाही ना? याचा आपण निश्चितपणे विचार करणे आवश्यक आहे.
सातत्याने असणारी तेजी आणि मंदी भारतीय गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे का? गुंतवणुकदारांनी भविष्यातील ठरवलेल्या आर्थिक उद्दीष्टांसाठी केलेली गुंतवणूक अशा चढउतारांमुळे आपल्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचू शकेल का? या सर्वांसाठी आपण निश्चित विचार करणे गरजेचे आहे. बाजारातील चढउतार भविष्यातील उद्दीष्ट गाठण्यासाठी निश्चित मदत करत असतो. परंतु या बाजारातील दोलायमान स्थितीत प्रत्येक गुंतवणूकदाराने अत्यंत शांतपणे आपली गुंतवणूक सुरुच ठेवणे आवश्यक असते. सिस्टिमॅटिक इन्व्हस्टमेंट प्लॅन (एसआयपी), सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (एसटीपी) व एकरकमी गुंतवणूक हे पर्याय निश्चित योग्य ठरतील.
शेअर बाजारात सध्या होत असणारी पडझड प्रत्येक गुंतवणूकदारास पुन्हा गुंतवणूक वाढवण्याची उत्तम संधी देत आहे. या बाजारातील चढउतारांमुळे गुंतवणूकदाराने घाबरून जाऊन आपल्या उद्दीष्टांसाठी केलेली एसआयपी अथवा एकरकमी गुंतवणूक मध्येच काढून घेऊ नये किंवा थांबवू नये. असे करणे अत्यंत चुकीचे ठरू शकते. आपण काही उद्दीष्टे भविष्याच्या दृष्टीने ठरवत असतो. उदाहरणार्थ – मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च, मुलांच्या लग्नासाठीचा खर्च, निवृत्तीसाठीचे नियोजन, घरबांधणीसाठी खर्च, परदेश प्रवास अशी विविध उद्दीष्टे आपण गुंतवणूक करताना ठरवलेली असतात. या उद्दीष्टांसाठी लागणारा वेळ व अंदाजे खर्च हा गुंतवणुकीअगोदरच काढला जातो. यालाच आपण गुंतवणुकीचे नियोजन असे म्हणतो. नियोजन पूर्ण झाल्यावर उद्दीष्ट पूर्ततेसाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे हे महत्त्वाचे ठरते. गुंतवणुकीस सुरवात झाल्यावर सध्या ज्या प्रकारे शेअर बाजाराचा प्रवास सुरु आहे ते पाहता आपण ठरवलेली उद्दीष्टे काही काळासाठी विसरून जातो व वेगवेगळ्या नकारात्मक बातम्यांमुळे गुंतवणूकदार गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असतो.
शेअर बाजाराच्या या संक्रमण काळात मोठ्या धैर्याने आपली गुंतवणूक सुरुच ठेवणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक सल्लागारच्या मदतीने घडलेल्या व घडत असलेल्या घटनांचा योग्य अर्थ व परामर्श घेणे आवश्यक आहे. गरज पडल्यास गुंतवणुकीच्या पर्यायांचा पुनर्विचार करता येऊ शकतो व आवश्यक वाटल्यास काही बदलही करता येतील. परंतु पूर्णपणे गुंतवणूक थांबवणे किंवा काढून घेणे हे आपल्या उद्दीष्टांसाठी मारक ठरते.
बाजारातील पडझड ही गुंतवणूक वाढविण्याची संधी (भाग-2)
उदाहरणार्थ – आजपासून पंधरा वर्षानंतर मुलाच्या उच्च शिक्षणसाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी रु. दहा हजारांची एसआयपी करण्याचे ठरवले आहे आणि १२ टक्के चक्रवाढ व्याजदराने मिळणारी रक्कम रू. ५०,४६,००० पंधरा वर्षानंतर निर्माण होणार आहे. परंतु जर आपण आपली गुंतवणूक बाजारातील चढउतारांमुळे बदलल्यास नवीन गुंतवणुकीमध्ये १२ टक्के चक्रवाढ व्याजदराऐवजी ८ टक्के व्याजदर मिळाला तर १५ वर्षांनंतर मिळणारी रक्कम ३४,८३,००० रुपये असणार आहे आणि यामुळे आपले उद्दीष्ट पूर्ण होणार नाही.