तब्बल 67 टीएमसी विनावापर सोडले पाणी
पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने कोयना धरणाचे सलग अकरा दिवस उघडे असणारे दरवाजे शुक्रवारी दुपारी तीन वाजता बंद करण्यात आले. त्यामुळे धरणाच्या दरवाजामधून होणारा विसर्ग बंद झाला असून पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाणी वीजनिर्मिती करून सोडण्यात येत आहे.
मात्र यावर्षी तब्बल 67 टीएमसी विनावापर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक या राज्यांची विजेची व सिंचनाची गरज भागविण्याऱ्या कोयना धरणाने यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात अनेक विक्रमांची नोंद केली आहे.
1 जुलै ते 7 जुलै या पाच दिवसात तब्बल 50.63 टीएमसी विक्रमी पाणीसाठा धरणात झाला. यामुळे याच कालावधीत 48 टक्के धरण भरले. कोयना धरणाच्या इतिहासात 1961 नंतर पहिल्यांदा जलदगतीने धरण यावर्षी भरले आहे. 3 ऑगस्ट रोजी कोयना धरणाचा पाणीसाठा 88.50 झाल्यानंतर धरणाच्या वक्र दरवाजांद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र 3 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट असे सलग अकरा दिवस कोयना धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा विक्रमही यावर्षी नोंदविण्यात आला आहे. मात्र याकाळात तब्बल 67 टीएमसी पाणी विनावापर कोयना नदीपात्रात सोडण्यात आले. या पाण्याने अजून एक धरण भरले असते. त्यामुळे कोणतेही वीजनिर्मिती न करता एका धरणाचा पाणीसाठा होईल एवढे पाणी विनावापर सोडून देण्यात आले. तर पायथा वीजगृहातून केवळ 2.30 टीएमसी पाणी वीजनिर्मिती करून नदीपात्रात सोडण्यात आले.
कोयना धरणाचा पाणीसाठा 98.89 टीएमसी झाला असून कोयनाधरण क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे.आज नवजा याठिकाणी 7 मिलीमिटर तर कोयना याठिकाणी केवळ 14 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
सध्या धरणाची पाणीपातळी 2158.07 फूट झाली आहे. तर 12 हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. सध्याचा पाणीसाठा 98.88 टीएमसी असून 105.25 टीएमसी साठवण क्षमता असणारे कोयनाधरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 26.36 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक व पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.