नगर – जिल्ह्यातील 1 हजार 602 गावांना येत्या 31 मार्च अखेर टंचाईची झळ बसणार नाही. या संदर्भात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जिल्ह्यातील 1 हजार 527 निरीक्षण विहिरींच्या 15 ऑक्टोबर दरम्यान नोंदी घेण्यात आल्या होत्या. यासाठी प्रशिक्षित जलसुरक्षक नियुक्त करण्यात आले होते. आता यासंदर्भातील भूजल सर्वेक्षणचा अहवाल प्राप्त झाला आहे.
दरवर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर अशा महिन्यांमध्ये भूजल पातळीची नोंद केली जाते. जिल्ह्याच्या पाणी पातळीच्या अद्यायावत नोंदी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणे मार्फत घेतल्या जातात. यासाठी मागील वर्षा पर्यंत जिल्हाभरात 202 विहिरी निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, भूजल पातळीची नोंद अचूक प्राप्त व्हावी यासाठी यंदा विहिरींची संख्या तब्बल 1 हजार 300 ने वाढविण्यात आली. जिल्ह्यातील 1 हजार 602 गावातील 1 हजार 527 निरीक्षण विहिरींतील पाणी पातळी घेण्याचे नियोजन भूजल यंत्रणेने केले.
त्यासाठी ग्रामस्तरावर नेमण्यात आलेल्या जलसुरक्षकांची मदत घेण्यात आली. भूजल पातळीची पाहणी केल्यानंतर तिची तुलना मागील पाच वर्षांच्या सरासरी भूजल पातळीशी करण्यात येते. त्यावरून कोणत्या तालुक्यातील गावांमध्ये कोणत्या महिन्यापासून पाण्याची टंचाई जाणवू शकते, तालुक्यातील भूजल पातळीमध्ये किती घट किंवा वाढ झाली आहे, भविष्यात त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अंदाज लावला जातो. यावरच जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात येत असतो.
यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने कर्जत, नगर, पाथर्डी, राहाता, संगमनेर व श्रीरामपूर या सहा उपविभागीय प्रयोगशाळांवर जबाबदारी देण्यात आली होती. व त्यांना पाणी पातळी कशी मोजावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये कर्जत, जामखेड व पाथर्डी या तीन ताल्यक्यातील पाणी पातळीत घट आढळून आली. दरम्यान सप्टेंबर नंतर परतीचा पाऊसाने हजेरीलावल्याने मागील 12 वर्षांची तुलनात्मक आकडेवारी जुळवत सरासरी 200 मि. मी. असा विक्रमी पाऊस झाला.