मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम साधला जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद
नगर – सायेब, मागच्या काळात कर्जमाफीसाठी लईवेळा हेलपाटे मारावे लागले. यावेळी फक्त थम्ब (अंगठा) दिला, अन काम झालं. अगदी सुटसुटीत आहे!, राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावच्या पोपटराव भानुदास मोकाटे यांची ही भावना… त्यांनी आज ती थेटपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवली आणि या दोघांनीही, ही भावना म्हणजे या सरकारसाठी आशीर्वादच आहेत. आनंदात राहा आणि हे आशीर्वाद कायम असू द्या, असे त्यांना सांगितले.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणीकरणासह प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात आज दि.24 झाली. प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील याद्यांचे प्रसिद्धीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रालयातील इतर मंत्री तसेच अधिकारी यांनी त्यातील काही गावांतील पात्र लाभार्थीं यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी (ता. राहुरी) आणि जखणगाव (ता. नगर) येथील शेतकऱ्यांना या संवादाची संधी मिळाली. नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे यावेळी उपस्थित होते. राज्यात सर्वात जास्त लाभ या योजनेचा नगर जिल्ह्याला मिळणार आहे.
2 लाख 58 हजार 787 शेतकऱ्यांना 2 हजार296 कोटी रूपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यात प्रातिनिधीक स्वरूपात या योजनेचा शुभारंभ करताना प्रथम नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नगर तालुक्यातील जखणगाव येथील 116 व राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील 856 अशा एकूण 972 शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. आज जिल्ह्यातील ब्राह्मणी व जखणगाव गावातील शेतकऱ्यांच्या याद्या प्रातिनिधीक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्या.
त्यानंतर यादीनुसार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरु करण्यात आले. दिनांक 28 फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील सर्वच गावात याद्यांची प्रसिद्धी होऊन आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दुपारी एक वाजता या संवादास सुरुवात केली. राज्यात कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीत प्रथम क्रमांकावर असलेल्या नगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी त्यांनी सर्वप्रथम संवाद साधला.
सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी जिल्ह्यातील कोणत्या गावातून आलात, हे विचारले. त्यानंतर पोपटराव मोकाटे यांच्याशी सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संवाद साधला. किती कर्ज होते? कशासाठी घेतले…अशी विचारणा केली. त्यावर पोपटरावांनी ऊसासाठी 28 हजार रुपये कर्ज घेतले. त्यावरील व्याजासह 32 हजार रुपये झाल्याचे सांगितले. हे कर्ज माफ होणार असल्याने अतिशय आनंद आहे. प्रशासन आणि सरकारचं खरोखरंच आभार, असे त्यांनी सांगितले. पोपटरावांनी आभार मानताच म्ुख्यमंत्री ठाकरे यांनी आभार कसले… हे तर कर्तव्यच असल्याचे सांगितले आणि तुमचे आभाराचे शब्द म्हणजे आमच्यासाठी आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.
बळीराजाला दुखावू नका, त्यांची कामे वेळेत पूर्ण करा. आपण ही योजना आणलीय. ती कमी वेळेत पूर्ण करण्याचे श्रेय प्रशासनाला जाते, असे कौतुकोद्गारही काढले. या संवादासाठी ब्राह्मणी व जखणगाव येथील अनेक शेतेकरी उपस्थित होते.