नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्याला दररोज किमान 60 मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र, त्यात तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.
जिल्ह्यात दररोज करोना रुग्णांमध्ये तीन हजारांनी वाढ होत आहे. त्यामुळे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर पुरविण्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. जिल्ह्यातील हॉस्पिटलही आता तोकडी पडत आहेत. जिल्हा रुग्णालय व अन्य शासकीय, खासगी रुग्णालयांसाठी एकूण 60 मेट्रिकटन लिक्विड ऑक्सिजन आवश्यकता आहे.
मुंबई येथील अन्न व औषध प्रशासनाच्या ऑक्सिजन नियंत्रण कक्षाकडे दैनंदिन ऑक्सिजनची मागणी नोंदविण्यात येते. जिल्ह्यातील रिफिलटरचे टँकर उत्पादकांचे ठिकाणी वेळेवर भरून मिळण्याकरिता राज्यस्तरीय सनियंत्रण समिती पाठपुरावा करीत आहेत.
नगर जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजन उत्पादक कंपन्यामार्फत पाच रिफिलरच्या माध्यमातून विविध रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविण्यात येतो. दैनंदिन ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांकडून संकेतस्थळावर ऑक्सिजनची मागणी प्राप्त होते. त्यानंतर जिल्हास्तरीय पथकामार्फत जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वितरित करण्यात येतो. जिल्ह्यातील ऑक्सिजन रिफिलर प्लॅट ठिकाणी पथक नेमली असून, रिफिलरद्वारा वितरित होणारा ऑक्सिजन फक्त वैद्यकीय वापरासाठी पुरविण्यात येत आहे.