सुरेश डुबल
दोन मंत्रिपदांमुळे गतीने विकास करण्याची संधी; दोघांनी स्वीकारला पदभार
कराड – ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार उदयाला आले. या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे ना. बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट तर शिवसेनेचे ना. शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन मंत्र्यांमुळे जिल्ह्याचा व्यापक विकास होईल, अशी अपेक्षा जनतेला आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निकालानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. सेना-भाजप युती तुटली आणि राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आली. आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर गेली अनेक दिवसांपासून रखडलेले उद्धव ठाकरे सरकारचे खातेवाटप पार पडले. 30 डिसेंबर 2019 ला तीनही पक्षातील मंत्र्यांनी आपापल्या मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यांची खाती जाहीर करण्यात आली नव्हती.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. मात्र खातेवाटपावर एकमत होत नव्हते. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्याकडे महत्त्वाची खाती ठेवल्याचे मत कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले होते. अखेर त्यावर मोठा काथ्याकूट झाला आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी नंतर सहा दिवसांनी खाते वाटप करण्यात आले.
30 डिसेंबरला सातारा जिल्ह्यातील दोघांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण आनंदमय झाले. कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील यांना सहकार, पणन ही खाती देण्यात आली. तर राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांना गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन अशी खाती बहाल केली. आज या खात्याचे रितसर वाटप झाल्याने खाते वाटपाचे अडलेले घोडे आता निकालात निघाले.
क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची मुहूर्तमेढ यशवंतराव चव्हाण यांनी या जिल्ह्यातूनच रोवली होती. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला होता. यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपद भूषवून राज्यासह देशात साताऱ्याचे नाव केले होते. त्यानंतर अगदी 2010 पर्यंत जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी विविध मंत्रिपदे भूषवली होती.
2010 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने जिल्ह्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळाले होते. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत ज्या ज्या राजकारण्यांनी मंत्रिपदे भूषविली, त्यांनी जिल्ह्याला एक वेगळा आयाम मिळवून दिला.
आता ना. बाळासाहेब पाटील व ना. शंभूराज देसाई यांच्या रुपाने दोन सक्षम मंत्री जिल्ह्याला मिळाले आहेत. या दोघांकडे मिळून ग्रामीण भागाशी निगडित असलेली सहकार व पणन यासह गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता यासारखी महत्त्वाची खाती आहेत. त्यामुळे या संधीचं सोनं निश्चितच त्यांच्याकडून केले जाईल.
याआधी जिल्ह्यातील आठही आमदारांना विकासनिधी मिळत होता. मात्र, तो तोकडा असल्याने मतदारसंघासह जिल्ह्यात नवनवीन प्रकल्प राबवता येत नव्हते. जो निधी मिळत होता, त्यात कसेबसे मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमदारांकडून केला जात होता. आता मात्र मंत्रिपदे मिळाल्याने ना. पाटील व ना. देसाई यांचे महत्त्व वाढले आहेच, शिवाय त्यांचा आवाकाही राज्यभर पसरला आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यात विकासाभिमुख उभे राहिलेले प्रकल्प सातारा जिल्ह्यात राबविणे सोपे जाणार आहे.
ना. बाळासाहेब पाटील यांना सहकार व पणन ही खाती मिळाली आहेत. पश्चिम महाराष्ट्र हा सहकारी संस्थांचे जाळे असलेला विभाग. त्यामुळे सहकार असो की पणन यासारखे खाती पश्चिम महाराष्ट्रातच मिळाल्याने याचा बराचसा फायदा येथील शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाला होणार आहे.
ना. शंभूराज देसाई यांना गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता ही खाती मिळाली आहेत. शेतकऱ्यांपासून बेरोजगारपर्यंत सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्यासाठी ते या खात्यांचा योग्य वापर करतील. यानिमित्ताने व्यापक विकासासाठी मतदारसंघासह जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर नेण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली आहे. येणाऱ्या काळात या दोन्ही मंत्र्यांकडून जिल्ह्यात शेतकऱ्यांपासून ते बेरोजगारीपर्यंत सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवले जातील आणि सातारा जिल्ह्याचाही विकास गतीने होईल, अशी जनतेची अपेक्षा आहे.