पुणे : आज समाजावर मोठ्या प्रमाणात धर्म,जाती,रूढी आणि परंपरा यांचा पगडा आहे. या सर्वांमध्ये अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. या गैरसमज आणि अंधश्रद्धांनी समाजाला जखडून टाकले आहे, त्यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अविवेक निर्माण झाला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समाजातील हा अविवेक दूर झाला पाहिजे अशी भावना विधीतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
महा एनजीओ फेडरेशन, सोशल रिस्पॉन्सीबिलिटी आणि युवक मित्र समूह यांच्यातर्फे विवेकानंद आणि जिजाऊ समाज रत्न आणि जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
योगाचार्य रमेश अग्रवाल यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. कमलेश कुलकर्णी, जगदीश पावरा, राजश्री आगम, डॉ कृष्णा भावले, डॉ लक्ष्मण सोनार यांना विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर प्रमोद पाटील,हनमंत बारबोले यांना विवेकानंद समाज रत्न आणि प्रियांका पोरवाल, अस्मा शेख,चांदणी गोरे यांना जिजाऊ समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
असीम सरोदे म्हणाले,समाजातील सर्वच राजकीय पक्षांनी माणूस घडविण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशावेळी सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. कारण समाजाच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. सर्व जाती आणि धर्मामधील विवेक दूर करून समाज शुद्ध करण्याची गरज आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या, सामाजिक काम करणे हे अत्यंत अवघड काम आहे. त्यातही विविध प्रकारचे सामाजिक काम करणार्यांना एकत्र आणून त्यांची मोट बांधणे अतिशय महत्त्वाचे काम आहे. सामाजिक संस्थांचे समाजाच्या वाटचालीमध्ये आणि त्याचे सकारात्मक दिशेने वाढ होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे तरुणांना अधिकाधिक सामाजिक कार्यामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे.
यावेळी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे अध्यक्ष अतुल लाहोटी, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, शेखर मुंदडा, विजय वरुडकर,राजू धारीया, रमेश धूत आशिष फोलकडे, प्रदीप हाके, भाग्यश्री साठे, मुकुंद शिंदे, प्रवीण महाजन आदी यावेळी उपस्थित होते. देवा दडस यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बाकले यांनी आभार मानले.